गोगलगाय पोटात पाय, झाडावर चढते अन्‌ करते काय? वाचाच...

file
file


वेलतूर (जि.नागपूर) : वेलतूर व परिसरात गोगलगाय मोठ्या प्रमाणात आढळत असून तिचा वावर शेतक-यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. तिचा बंदोबस्त करणेही कठीण असून कृषी औषधी फवारणीला ती जुमानत नसल्याने सारेच हतबल झाले आहेत.
 

परिसरात घातला धुमाकूळ
पावसाळा सुरु झाला. हमखास आपल्या नजरेस पडणारी ही गोगलगाय. वर्षभर कुठेतरी गायब असते? ही गोगलगाय पावसाळ्यात मात्र रस्त्यावर माळावर, शेतात मुक्त संचार करते. संचार म्हणणेही चुकीच ठरेल. कारण संचार करण्याइतका चंचलपणा तिच्यात नसलातरी तिचे अस्तित्व व रात्री तिच्या हालचाली बघणाऱ्याला डोक्‍यावर हात ठेवण्यास भाग पाडणाऱ्या आहेत. परिसरात सदया गोगलगायींचे अस्तित्व मोठया प्रमाणात दिसून येत आहे. अनेक शेतक-यांच्या शेतात या गोगलगायींनी धुमाकूळ घातला आहे. अतिशय संथ वृत्तीची ही गोगलगाय असली तरी शेतकरीवर्गासाठी मोठी धोकादायक आहे. गोगलगाय नी पोटात पाय, अशी म्हण प्रचलित आहे.  पावसाळा सुरु झाला की आपल्याला घरातल्या कुंडीपासून अगदी गार्डनपर्यंत सर्व ठिकाणी दिसून येते ती म्हणजे गोगलगाय. पावसाळ्याव्यतिरिक्तसुद्धा ती इतर ऋतूंमध्ये तलावात, नदीत, अगदी समुद्र किनारीही आढळून येते. पण सदया वेलतूरात ती कोणत्याही झाडावर आढळून येते. आपण जास्तीत जास्त 8 ते 12 तास झोपू शकतो, परंतू तब्बल तीन वर्ष झोपणारा जीवसुद्धा या पृथ्वीतलावर आहे, आणि तो म्हणजे गोगलगाय होय. गोगलगाय एका जागी निपचित पडली की तिथेच चिकटून बसते. या निरूपयोगी प्राण्यांचा उपद्रव वाढला असल्यामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत आहेत. परिसरातील अनेक शेतक-यांनी ही व्यथा व्यक्‍त केली आहे.

गोगलगाय जगते कशी?
साधारणतः गोगलगायीला जीवंत राहण्यासाठी ओलाव्याची गरज असते. त्यामुळे गोगलगाय फक्त जून ते सप्टेंबर महिन्यातच आपल्याला जास्त सक्रिय दिसेल. म्हणजे हालचाल करताना दिसेल. इतर वेळेस ती निष्क्रिय म्हणजे शांत असते. याचा अर्थ असा की वातावरणात भरपूर कालावधीपर्यंत ओलावा निर्माण झाला नाही तर गोगलगाय झोपलेल्या अवस्थेतच राहते. गोगलगायीचे आणखी एक आश्‍चर्य सांगायचे झाले तर एवढीशी दिसणारी गोगलगाय 25 वर्ष जगते. गोगलगाईचे शरीर हे मऊ व चिकट असते. गोगलगाईला पाय नसल्याने तिच्या शरीरातून निघणाऱ्या एका विशिष्ट प्रकारच्या स्त्रवामुळे तिला पुढे सरकण्यास मदत होते. यामुळे तिचे मोलस्क या प्राणीवर्गात वर्गीकरण केले जाते. यामध्ये शंख, शिंपले, काजवे हे प्रकारसुद्धा येतात. या वर्गाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यांचे अतिशय मऊ शरीर जे एकसंध असते. हे त्यांचे एकसंध, लांब शरीर कायम ओले आणि चिकट असते. या नाजूक शरीराच्या संरक्षणासाठी त्यांना जन्मजात एक कठीण शंख असतो. जेव्हा त्यांना धोका जाणवतो, तेव्हा ते लगेच त्यांचे शरीर या संरक्षक कठीण शंखाच्या आत ओढून घेतात. प्रखर उन्हाळ्यात अथवा अतिशय गरम वातावरणातसुद्धा या गोगलगायी त्यांचे शरीर या शंखाच्या आत ओढून घेतात आणि त्याचे दारसुद्धा झाकणाद्वारे बंद करतात. यामुळे त्यांचे ओले शरीर गरम वातावरणामध्ये सुकण्यापासून वाचते. सूर्यप्रकाशाशी वावडे असल्यामुळे बहुतांश गोगलगायी या निशाचर असतात. रात्री किंवा ढगाळ वातावरणात त्यांचा वावर जास्त असतो. त्याचप्रमाणे अतिथंड हवामानात किंवा हिवाळयात या जमिनीखाली शितनिद्रेत जातात. हा शंख मुळात कैल्शियम पासून बनलेला असतो आणि त्याच्या वाढीसाठी गोगलगायीची वाढ होणे आवश्‍यक असते.

अधिक वाचा :लॉकडाउनचा होणार नाही शेतीकामावर परिणाम, काय आहे कारण...

ती खाते काय?
गोगलगायीची वाढ तिचे खाणे, पाण्यातील आम्लाचे प्रमाण आणि पाण्याचे तापमान यावर अवलंबून असते. गोगलगायीच्या शरिरावरचा चिकटपणा किंवा श्‍लेष्म त्यांना सुखण्यापासुन वाचवतो. जऱ 50% पेक्षा जास्त पाणी त्यांच्या शरीरातून वाळून गेले तर त्यांचा मृत्यू होवू शकतो म्हणून हा श्‍लेष्म त्यांना सतत ओले ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. जमिनीवरच्या काही जातीच्या गोगलगायीना शिंगाच्या दोन जोड्या असतात. अर्थातच ही शिंगे मऊ आणि नरम असतात. ह्यातील लांब शिंगाच्या टोकावर त्यांचे डोळे असतात आणि ही शिंगे त्या डोळ्यासकट ते आत शरीरात ओढून घेवू शकतात. दुसरी शिंगाची जोड़ी ही आखूड व जाडसर असते. हिचा उपयोग वास घेण्यासाठी आणि आजूबाजूच्या परिसराला स्पर्श करण्यासाठी, त्याचे ज्ञान मिळवण्यासाठी होतो. निसर्गात ह्या गोगलगायी सडलेल्या भाज्या अथवा पाने, बुरशी, अळम्बी, सडलेले लाकूड वैगरे खातात. भारतातील काही दुर्गम भागात गोगलगाय हा प्राणी चुलीवर शिजवून खाल्ला जातो. त्याला गोगलगायीचा रस्सा(snail curry) असेही म्हणतात.
शेतातील हिरवीगार रोपटी या गोगलगायींचे खाद्य आहे. पिकावर चढून ती पाने, झाडाचे खोड, फुले, फळे आदी फस्त करते.

शेतक-यांना पडला प्रश्‍न
गोगलगाय हा पर्यावरणातील एक उपयुक्त घटक आहे. दिवसेंदिवस या प्रजातीतील गोगलगायीची संख्या कमी होत चालली आहे. खरे म्हणजे पर्यवर्णातील कीटक हा फार दुर्लक्षित घटक आहे. साधारणतः आकाराने लहान आणि सहज नजरेला न दिसणारे हे जीव पायाखाली चिरडले गेल्यावरच त्याची जाणीव होते. अतिशय नाजूक आणि स्वतःच्या शरीराचे घर करून राहणारी ही गोगलगाय पर्यावरणातून लोप पावते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. मात्र सध्या तरी शेतकरीवर्गाच्या समोर तिच्यापासून आपले पिक कसे वाचविताता येईल; हा प्रश्न उभा ठाकला आहे.

मार्गदर्शनाची गरज आहे
गोगलगाय शेतकरीवर्गाच्या मुळावर उठली आहे. ती फळझाडे नष्ट करत आहे. भाजीपाला पिकेही संपवित आहे. उपाययोजना करण्यासाठी मार्ग दर्शनाची गरज आहे.
पंकज शेंडे
शेतकरी

                                   संपादन  : विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com