Nagpur News : विदर्भातील वाघाची लवकरच सह्याद्रीत डरकाळी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात मे महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्यातील दोन वाघांना हलविण्याच्या हालचालीला वेग आलेला आहे.
tiger
tigerSakal

नागपूर : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात मे महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्यातील दोन वाघांना हलविण्याच्या हालचालीला वेग आलेला आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आठ वाघांना सोडण्यास हिरवा कंदील दिला आहे. यामुळे शून्य वाघ असलेल्या जंगलात लवकरच वाघाची डरकाळी ऐकू येणार आहे.

यात एक वाघ आणि एका वाघिणीचा समावेश आहे. राज्यात सध्या ४४४ वाघ असून त्यातील ९५ टक्के वाघ हे विदर्भातील जंगलात आहेत. भारतीय वन्यजीव संस्थेने काही वर्षांपूर्वी सह्याद्रीत विष्ठेच्या ४४ नमुन्यांचे विश्लेषण केले होते.

त्यातील सात नमुने हे वाघांचे होते. मात्र, हे सातही वाघ स्थलांतरित होते. २०१४ च्या गणनेत सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघ आढळल्याच्या नोंदी आहेत. मात्र, येथे वाघ कधीच स्थिरावला नाही. दोडा मार्गे वाघ या प्रकल्पात येत होते.

प्रकल्पातील कॉरिडॉर ब्रेक झाल्याने वाघाचे स्थलांतर थांबल्याचे संशोधनात पुढे आले आहे. पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात २० ते २१ वाघ सामावून घेण्याची क्षमता असतानाही येथे वाघ स्थिरावू शकले नाहीत. आता मात्र, वैज्ञानिक अभ्यास करून अडचणी दूर केल्या आहेत. त्यामुळे या प्रकल्पात वाघाची डरकाळी ऐकू येणार आहे, असा विश्वास महिप गुप्ता यांनी व्यक्त केला.

सह्याद्रीही पन्नाच्या मार्गावर जाणार

मध्य प्रदेशातील पन्ना व्याघ्र प्रकल्पातही २००८ पूर्वी वाघांची संख्या शून्य झाली होती. तेव्हा तेथील मूर्ती या वनाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन कान्हा व्याघ्र प्रकल्पातील वाघांना पन्ना व्याघ्र प्रकल्पात सोडले. आता येथील वाघांची संख्या १०० झालेली आहे.

डब्ल्यूआयआयचे तांत्रिक साहाय्य

सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघ स्थिरावण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केलेत. वाघाचा अधिवास आणि वाढीसाठी पोषक वातावरण तसेच खाद्यान्न याकडे लक्ष देण्यात आले. तृणभक्षक प्राण्यांची संख्या वाढविण्यासाठी सागरेश्वर अभयारण्यातून तृणभक्षक प्राणी स्थलांतरित केलेत. यासाठी भारतीय वन्यजीव संस्थेकडून (डब्ल्यूआयआय) तांत्रिक साहाय्य घेण्यात येत आहे. ज्येष्ठ वनाधिकारी व संशोधक रमेश यांच्या मार्गदर्शनात या स्थलांतरण प्रक्रिया पार पडणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात दोन वाघांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात येणार आहे. त्याची तयारी पूर्ण झालेली असून वाघाची ओळखही झालेली आहे. वाघाला सोडल्यानंतर त्याचा मागोवा घेण्यासाठी चमूही तयार करण्यात आलेली आहे. सॅटेलाईट कंट्रोल रूमही सज्ज आहे. पुढील महिन्यात या वाघांना सह्याद्रीमध्ये सोडण्यात येणार आहे.

- महिप गुप्ता, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com