
गडचिरोली : राज्याच्या राजकारणात झालेल्या मोठ्या भूकंपानंतर रविवार (ता. २) झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना मंत्रिपदाची लाॅटरी लागली आहे. विशेष म्हणजे धर्मरावबाबा आत्राम यांना तब्बल १५ वर्षांनंतर मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.
धर्मरावबाबा आत्राम यांनी यापूर्वी तिनदा मंत्रीपद अनुभवले आहे. रविवारी त्यांनी चौथ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. १९७५ मध्ये ते सर्वप्रथम अहेरी ग्रामपंचायतीचे सदस्य झाले. पुढे १९८० मध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर ते १९८२ पर्यंत सभापती राहिले.
गडचिरोली जिल्हा निर्मितीच्या आंदोलनातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. १९८५ ते १९८८ या कालावधीत त्यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. पुढे १९९० मध्ये तत्कालीन सिरोंचा विधानसभा क्षेत्रातून धर्मरावबाबा हे काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले.
त्याच सुमारास २७ एप्रिल १९९१ रोजी आलापल्ली- भामरागड मार्गावरील मेडपल्ली येथे एका लग्न समारंभासाठी गेले असता नक्षलवाद्यांनी त्यांचे अपहरण केले होते. जहाल नक्षलवादी विकास उर्फ शिवण्णाच्या सुटकेनंतर नक्षल्यांनी तब्बल २० दिवसांनंतर धर्मरावबाबांची सुटका केली होती.
त्यानंतर जून १९९१ मध्ये त्यांचा आदिवासी विकास व वनराज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. १९९९ मध्ये धर्मरावबाबांनी गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढविली आणि ते विजयी झाले. १६ जुलै २००२ रोजी त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळाले.
पुढे २००४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजयश्री मिळवली आणि सामाजिक न्याय, खनिकर्म व परिवहन राज्यमंत्री म्हणून त्यांची वर्णी लागली. मात्र, चिंकारा शिकार प्रकरणात २००८ मध्ये त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
पुढे २००९ ते २०१९ अशी दहा वर्षे धर्मरावबाबांना पराभवामुळे विधानसभेबाहेर राहावे लागले. मात्र २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी ताकदीने विजय प्राप्त केला. पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून धर्मरावबाबांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले.
तब्बल १५ वर्षांनंतर त्यांना मंत्रिपद मिळाल्याने जिल्हावासीयांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. धर्मरावबाबा आत्राम यांना महत्वाचे खाते आणि जिल्ह्याचे पालकमंत्रिपद द्यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. ही माहिती मिळताच जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतषबाजी करून व त्यांच्या विजयाच्या घोषणा देत आनंद साजरा केला.
घरच्यांनाही नव्हता पत्ता...
राज्यातील या प्रचंड मोठ्या उलथापालथीमध्ये अजित पवार यांच्यासोबत सहभागी असलेल्या सर्वांनी हे टाॅप सिक्रेट कसोशिने पाळले होते. धर्मरावबाबा आत्राम मुंबईला जाणार, त्यांना मंत्रिपद मिळणारे हे पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्तेच नव्हे, तर त्यांच्या घरातील सदस्यांनाही माहित नव्हते. धर्मरावबाबा गनिमी कावा करत अहेरीतून सिरोंचा गेले तिथून हैदराबादला पोहचून मग थेट मुंबईत गेल्याची माहिती काही जणांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.