शेतकऱ्यांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे बरं का... वाचाच एकदा

Need of new experiments in agriculture
Need of new experiments in agriculture

यवतमाळ : शेतीमध्ये नवनवीन प्रयोगांची गरज आहे. शेतीचे व्यवस्थापन करताना लागवडीचा खर्च कमी कसा करता येईल, याचा विचार करणे आवश्‍यक झाले आहे. पेरणी करताना जर शेतकऱ्यांनी सरी-वरंबा पद्धतीचा अवलंब केला तर बियाण्यांवरील खर्च कमी होऊन पिकाचा उताराही वाढतो. ही पद्धत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. उमरी येथील शेतकऱ्याने आठ एकर शेतात हा प्रयोग यशस्वीपणे केला आहे.

बाभूळगाव मंडळाचे कृषी अधिकारी सुरेश गावंडे यांनी सरी-वरंबा (बीबीएफ) पद्धतीने तूर व सोयाबीन या आंतरपिकांची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना (बीबीएफ) यंत्रेदेखील उपलब्ध करून दिले. यवतमाळ-बाभूळगाव मार्गावरील चिमणापूरपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरी (स्मारक) येथील आशुतोष पटवारी यांनी शेतात सरी-वरंबा पद्धतीने तूर व सोयाबीनची पेरणी केली आहे.

अलीकडे धोके ओळखून शेती करावी लागते. एकाच पिकावर अवलंबून राहता येत नाही. त्यामुळे आंतरपिक घेतल्यास एक पीक हातचे गेले तरी दुसरे पीक ते नुकसान भरून काढते. त्यामुळे शेतकरी सोयाबीन सोबत तुरीचे आंतरपीक घेण्यास प्राधान्य देतात. आशुतोष पटवारी यांनी आठ एकरांत सोयाबीन-तुरीची पेरणी सरी-वरंबा पद्धतीने केली आहे. चार तासांनंतर त्यांनी एक तास तुरीचे टोबले आहे.

तूर लावताना ती झिकझॅक पद्धतीने टोबली आहे. सरी-वरंबा या पद्धतीत गादी वाफ्यावर सोयाबीन पेरले जाते. त्याच्या बाजूला निर्माण झालेल्या वरंब्यावर तूर टोबली जाते. त्यामुळे बियाणे पेरताना वाया जात नाही. ते सारख्या अंतरावर पडते. बियाणे जमिनीत तीन ते चार इंच खोल पडते. या पद्धतीत बियाणे एकरी 22 किलो लागते व आठ किलो बियाण्यांची बचत होते. पेरताना सोबत खतसुद्धा देता येते. पावसाचा खंड पडला तरी बियाणे गादी वाफ्यावर पडत असल्यामुळे किंवा जास्त पाऊस झाला तरी उगवणशक्तीवर किंवा पिकांवर अजिबात परिणाम होत नाही.

जास्त पाऊस पडला तरी गादी वाफ्याच्या बाजूला असलेल्या नालीतून पावसाचे पाणी वाहून जाते. तर कमी पाऊस पडला तर गादी वाफ्यात पाण्याचा ओलावा साचून राहतो. त्यामुळे पिकांवर कमी किंवा जास्त पावसाचा परिणाम होत नाही. सोबतच बाजूला वरंव्यावर तूर लावल्यामुळे रोपाअवस्थेत होणारा मर रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. पाऊस जास्त झाला तरी तूर उबाळत नाही किंवा जळत नाही. ही पद्धत पेरणीसाठी वापरल्यास शेतकऱ्यांना हमखास दोन्ही पिके चांगल्या प्रकारे घेता येतात.

तुरीची माळा होऊन तुरीचे उत्पन्नसुद्धा वाढते

या पद्धतीने पेरणी केल्यास शेतकऱ्यांना एकरी दोन ते तीन क्विंटल सोयाबीन व तुरीचे उत्पन्न जास्त होण्याची शक्‍यता आहे. तसेच बियाण्याचा खर्चही वाचतो. सरकारने शेतकऱ्यांना बीबीएफ यंत्र उपलब्ध करून दिले आहे. बाभूळगाव तालुक्‍यातील सुमारे 25 शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. तुरीची माळा होऊन तुरीचे उत्पन्नसुद्धा वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन-तूर या आंतरपिकाची पेरणी ही सरी-वरंबा पद्धतीने करावी.
सुरेश गावंडे,
मंडळ अधिकारी, बाभूळगाव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com