नागपूर : शिवसेनेचे युवा आमदार आदित्य ठाकरे यांनी पुरवणी मागण्यांवर बोलताना भाजपवर शरसंधान करून राज्यात भाजपने चिखल केल्याची बोचरी टीका केली होती. मात्र, राज्यात तीन पक्षांमुळे निर्माण होणाऱ्या चिखलातूनच पुन्हा कमळ उगवेल, असे सांगून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या टीकेला चोख उत्तर दिले.
अंतिम आठवडा प्रस्तावावर ते विधानसभेत बोलत होते. नितेश राणे म्हणाले, सभागृहाच्या प्रथा-परंपरांना छेद दिला जात आहे. गेली पाच दिवस जे अनुभव आले, त्यामुळे उद्या उत्तरातून काही मिळेल, याबाबत शंका असल्याचे नितेश राणे म्हणाले. गेल्या जुन्या परंपराना तडा दिला. विरोधी पक्षनेते बोलले त्यावेळी मुख्यमंत्री हजर नव्हते. याशिवाय राज्यपालांद्वारे आयोजित चहापानाच्या कार्यक्रमात परंपरेनुसार मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांचे स्वागत केल्याचे बघायला मिळाले नाही.
अधिक माहितीसाठी - कमालंच की, मटणानंतर आता बोकडाच्या चामड्यासाठी आंदोलन
नव्या पिढीला यातून काय शिकायला मिळेल? हा प्रश्न आहे. सभागृहातही मुख्यमंत्र्यांकडून वैयक्तिक हिशेब चुकते करणारेच भाषण देण्यात आले. सभागृहात जनतेच्या प्रश्नावर चर्चेऐवजी वैयक्तिक हिशेब चुकवायला आलो काय? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी कोकणात झालेल्या नुकसानीवर सरकारचे लक्ष वेधले.
अजित पवार यांच्या मदतीने यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवसांचे मुख्यमंत्रिपद भूषविले. मात्र, त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत सत्तानाट्याचा शेवट केला. त्यानंतर तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली. मात्र, दादांनी आताही विचार केल्यास आजचा अंतिम आठवडा प्रस्ताव सरकारचा अंतिम प्रस्ताव ठरेल, असेही नितेश राणे म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.