Washim : शहरात एकही बगीचा नाही

टिळक उद्यान व टेंम्पल गार्डन हे दोन बगीचे केवळ कागदावरच
Garden
Garden Sakal

वाशीम : मानवाला जिवन जगण्यासाठी प्राणवायुची गरज असते. ही गरज झाडापासून पुर्ण होते. ग्रामीण भागात वनसंपदा भरपूर असली तरी शहरी भागात क्राॅक्रीटच्या जंगलात कुठेतरी शितलता असावी यासाठी बगिचे राखीव केले जातात. मात्र जिल्ह्याचा दर्जा मिळवून पंचवीस वर्षाचा कालावधी उलटला तरीही वाशीम शहरात एकही बगीचा नाही यावर कोणी सांगूनही विश्वास ठेवणार नाही. टिळक उद्यान व टेंम्पल गार्डन ही दोन बगिचे केवळ कागदावरच कोटींच्या भरार्या मारत असून सगळा सावळा गोंधळ निधीच्या पळवापळवीत उजागर झाला आहे.

आठ वर्षांपूर्वी शहराच्या उत्तरेला नव्या नगर पालिका इमारतीजवळ असलेल्या १४ एकर जागेतील इंग्रजकालीन टेंपल गार्डन हटविण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. तत्कालिन सत्ताधाऱ्यांनी यामधील अर्धे गार्डन व्यापारी संकुलासाठी तयार केले. मुळ म्हणजे बगीच्याचे आरक्षण हटवून व्यापारी संकुल बांधता येत नाही हा नियम असतांना या जागेवर व्यापारी संकुल बांधण्यात आले. त्यावेळी शहरातील काही नागरिकांनी बगीच्याच्या या काँके्रटीकरणाला विरोध केला होता. मात्र, उर्वरीत जागेत सुसज्य बगीचा साकारेल असे आश्वासन देवून विरोध दडपण्यात आला होता. तीन वर्षात भव्य व्यापारी संकुल उभे राहीले.

मात्र, टेंम्पल गार्डनची कासवगती कायम राहीली. या जागेमध्ये पालिकेच्या वतीने सुरक्षा भिंत व चार झोनच्या कामाचे कंत्राट देण्यात आले होते. तसेच मोनोरेल, तारांगण, अ‍ॅडव्हेंचर पार्क यासाठी कोट्यवधीचा निधी उपलब्ध झाला होता. मात्र तरीही या बगीच्यामध्ये सध्या रान उठले आहे. दक्षिणेकडील प्रवेश व्दारातून गुरे, असामाजिक तत्वे यांचा वावर राहतो. अंतर्गत रस्त्यांमध्ये पेव्हर ब्लॉक उद्यान सुरु होण्याआधीच उखडले गेले आहेत. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी ठेवलेला रनगाडा दुर्देवाचे दशावतार सांगत उभा आहे. अ‍ॅडव्हेंचर पार्कमध्ये असलेले झुले रानवेलीच्या विळख्यात गेले आहेत. निधीची कमतरता असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी उपलब्ध निधीतील कामेच कासवगतीने होत असल्याने शहरात सध्या एकही बगीच्या उभे राहण्या लायक राहिला नाही.

तारांगणात दिवसाच दिसतात तारे

जिल्हा वार्षिक योजनेमधून या टेम्पल गार्डनमध्ये तारांगण उभारले आहे. याच्यासाठी २ कोटी ४८ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. हे काम पूर्ण झाले असले तरीही गेल्या वर्षभरापासून तारांगण बंद आहे. म्हणजे अजून हे तारांगण सुरु झालेच नाही. तारांगणाच्या डोमने सुरु होण्याआधीच प्लेटची साथ सोडली आहे.

चोर सोडून स॔न्याशी फासावर

शहरातील टेंम्पल गार्डनची कोनशिला आठ वर्षापूर्वीच बसविली गेली होती. नियम वाकवून आलेल्या निधीत कमिशनखोरी करत तत्कालीन राज्यकर्त्यांनी क॔त्राटाची खैरात आपल्याच बगलबच्च्यांना वाटली. त्यात साहेब अन क॔त्राटदार गडगंज झाले ईकडे टेंम्पल गार्डन मात्र स्मशान झाले. आता निवडणूकीच्या तोंडावर पुन्हा टेंम्पल गार्डनचा विषय समोर करत विद्यमान अधिकार्यांना धारेवर धरण्याचे काम होत आहे. मात्र कंत्राट देताना कमिशन घेताना व झालेल्या निकृष्ट कामाचे देयके काढण्यासाठी अधिकार्यांवर दबाव आणणार्यांना जाब कोणी विचारत नाही. विद्यमान अधिकारी तर तीनच वर्षापासून कार्यरत आहेत त्या आधी पाच वर्ष जाब का विचारला गेला नाही याची चर्चा सध्या शहरात आहे.

असा झाला बगीच्यावर खर्च

गेल्या सात वर्षापासून कासवगतीने सुरु असलेल्या टेम्पल गार्डनच्या कामावर कोट्यवधीचा खर्च झाला आहे. सुरक्षा भिंतीसाठी १ कोटी १ लाख रुपये मंजूर झाले असून ८९ लाखाचे काम पूर्ण झाले आहे. विकास कामाच्या झोन १ साठी १ कोटी ६८ लाख, दुसर्‍या झोनसाठी १ कोटी ४ लाख, तिसऱ्या झोनसाठी १ कोटी ५७ लाख व चौथ्या झोनसाठी १ कोटी ८ लाख रुपयेे मंजूर झाले आहेत. त्यातील अनेक कामे ७० टक्क्यांवर पूर्ण झाली असली तरी पुढील काम थांबले आहे. या गार्डमध्ये अ‍ॅडव्हेंचर पार्कसाठी ५० लाखाचा निधी मंजूर झाला होता. हे काम पूर्ण झाले असले तरी अजूनही हे पार्क सुरु झाले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com