शेतकरीही झाले टेक्‍नोसॅव्ही! ऍपच्या माध्यमातून ई-पीकपाहणी

social-media
social-media

परतवाडा (अमरावती) :  शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिल्यावर शेतीचा विकास झाला. देश हळुहळु अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांसाठी मोबाईल फोनचे दालन खुले झाले. मोबाईलच्या माध्यमातून शेतकरी आपल्या शेतीविषयक शंकांचे निरसन करून घेऊ लागला आहे. आता तर शेतकरी मोबाईल ऍपचाही वापर करणार आहे.

शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या पिकांची नोंद आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करण्यासाठी शासनाने टाटा ट्रस्टच्या सहयोगाने "ई-पीकपाहणी' हे मोबाईलवरील ऍप्लिकेशन विकसित केले आहे. या ऍपचा वापर करून शेतकरी स्वतः आपल्या शेतातील पिकांची नोंद सातबारावर करू शकणार आहेत.

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या असणाऱ्या सातबारावर त्यांनी पेरलेल्या पिकांच्या नोंदी असणे आवश्‍यक असते. सद्य:स्थितीत गाव नमुना 12 वर तलाठ्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष पाहणी करून पिकांची नोंद केली जाते. तलाठ्यांकडील वाढत जाणारा कामाचा बोजा तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे अचानक एखादे महत्त्वाचे काम करावे लागणे, यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नोंदी घेणे यामध्ये विलंब लागू शकतो. त्यामुळे पीक नोंदीच्या आधारावर जी कामे शेतकऱ्यांना करावयाची असतात त्यामध्ये शेतकऱ्यांना अडचण निर्माण होते.

या सर्व बाबीचा विचार करून शासनाने या प्रक्रियेमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पीकपाहणी जलद, वस्तुनिष्ठ व पारदर्शक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अमरावती विभागातून अचलपूर तालुक्‍याची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली, अशी माहिती महसूल उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे यांनी दिली.

यासाठी शासनाने ई-पीकपाहणी हे मोबाईल ऍप तयार केले असून ते सर्व शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवर प्ले-स्टोअरमधून सहज घेता येणे शक्‍य आहे. या ऍपमध्ये सर्वांना समजेल, अशा मराठी भाषेत सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. या ऍपच्या माध्यमातून स्वतः शेतकरी आपल्या पिकांची नोंद घेऊ शकणार आहेत, शिवाय पिकाचा फोटो काढून तो ऍपवर अपलोड करावा लागणार आहे.
शेतकऱ्यांनी पिकांची नोंद करताच ही माहिती तलाठ्यांच्या लॉग इनवर उपलब्ध होणार आहे. त्याला तलाठी यांनी मान्यता देताच त्या नोंदीचा अंमल शेतकऱ्यांच्या सातबारावर तात्काळ होणार आहे, अशी माहिती अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी दिली.

 सविस्तर वाचा - ताई थांब जाऊ नको... स्वराजची शेवटची आर्त हाक

पीकपाहणी जलद होणार
विविध विभागांकडून अनेक योजना व कामांमध्ये अद्ययावत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून त्यात पारदर्शकता व गती निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. शासनाने पीकपाहणी जलद, वस्तुनिष्ठ व पारदर्शक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात प्रशासनाकडून प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम राबविण्यात येत असल्याचे पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com