आता हरभराही हातातून जाण्याची शक्यता; या रोगाने केले आक्रमण, शेतकरी चिंतित

सेलू : मर रोगाच्या प्रादुर्भावाने वाळत असलेले हरभऱ्याचे पीक.
सेलू : मर रोगाच्या प्रादुर्भावाने वाळत असलेले हरभऱ्याचे पीक.

सेलू (जि. वर्धा) : तालुक्‍यासह जिल्ह्यातील अनेक भागांत हरभऱ्याच्या पिकावर मूळकूज अर्थात मररोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. या बुरशीजन्य रोगामुळे झाडांची मुळे कुजत असल्याने झाड पिवळे पडून वाळत आहे. गत दोन आठवड्यांपासून ढगाळ वातावरणामुळे चण्याच्या पिकावर अळीचाही प्रादुर्भाव वाढल्याने हे पीकही हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

कोटंबा, कोलगाव, घोराड, केळझर, हिंगणी, झडशी, हिवरा, हेलोडी, पळसगाव (बाई), आलगाव, शिवणगाव, पैलाणपूर, दिग्रज, कळमना, मारडा आदी शिवारात हरभऱ्याचे पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे हरभऱ्याचे उत्पादनात घट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर्षी सुरुवातीला पावसाचा झालेला विलंब, नंतर कोसळलेला संततधार पाऊस, सततचे ढगाळ वातावरण यामुळे बहुतांश खरीप हंगामातील पिके हातची गेली. त्यामुळे मुख्यतः सोयाबीनच्या उत्पादनात घट आली आहे.


एकरी एक पोतही सोयाबीन पिकलं नाही. त्यामुळे सोयाबीन सवंगणीचाही खर्च निघाला नाही. सोयाबीनची प्रत खालावल्याने बाजारात भाव मिळाला नाही. कपाशीची वाढ खुंटली व नंतर बोंडअळीने आक्रमण केले. त्यातच मजुरांची टंचाई, दोन वेच्यातच कपाशीची उलंगवाडी झाली. परिणामी, कापसाचे उत्पादनही पाहिजे त्याप्रमाणे झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा पिकावर विशेष लक्ष केंद्रित केले.

मूळकूज रोगाचा प्रादुर्भाव

सुरुवातीच्या काळात गहू आणि हरभऱ्याच्या पिकांची स्थिती चांगली होती. या भागात अनेक शेतकऱ्यांनी एकरी ४० ते ४५ किलो हरभरा बियाण्यांची पेरणी केली. सध्या हरभऱ्याचे शेत पूर्णपणे झाकलेले आहे. मात्र, बहुतांश शेतात मूळकूज रोगामुळे हरभऱ्याची झाडे पिवळी पडून वाळत आहे.

कुठे कुठे रिकामे ठिगळ पडल्याने हरभऱ्याचे शेत दिवसेंदिवस विरळ होत आहे. याची बारकाईने पाहणी केली असता त्यावर मूळकूज नामक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. हा बुरशीजन्य रोग असून यात झाडांची मुळे हळूहळू कुजायला लागतात. त्यामुळे झाडे पिवळे पडून पूर्णपणे वाळते. या रोगाचा प्रादुर्भाव हरभऱ्याचे पीक फुलोरा अवस्थेत असताना होते, अशी माहिती येथील कृषी केंद्र व्यावसायिकाने दिली. हा रोग लवकर नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

हरभऱ्याचे पीकही हातातून जाणार
हरभऱ्याचे पीक जोमात आले असून फुलावर आहे. घाट्या पकडायला सुरुवात झाली असताना मररोग आल्याने पीक वाळायला लागले आहे. ढगाळ वातावरणाने अळीचाही प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे हरभऱ्याचे पीकही हातातून जाते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
- हरिश्चंद्र भटेरो, शेतकरी, वडगाव.

खोल नांगरणी करावी
हरभऱ्याचे झाड उपटून त्याच्या खोडात मधोमध बारकाईने पाहावे. खोडावर मुळापासून तर शेंड्यापर्यंत एक सरळ काळी रेषा आढळून आल्यास हा रोग मूळकूज किंवा मररोग असल्याचे समजावे. या रोगाचा प्रसार झपाट्याने होतो. पीक काढल्यानंतरही ही बुरशी नष्ट न होता शेतातच राहते. शेतातील गवतावर ती आपली उपजीविका करते. बुरशीचा समूळ नायनाट करण्यासाठी शेताची उन्हाळ्यात खोल नांगरणी करून शेत रखरखत्या उन्हात तापायला हवे.
- बाबाराव घवघवे, कृषी केंद्रचालक, सिंदी (रेल्वे)



(संपादन : दुलिराम रहांगडाले)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com