महागडे लाइट ट्रॅप शेतकऱ्यांच्या माथी

file photo
file photo

वर्धा : मागील दोन वर्षांपासून बोंडअळीच्या प्रादुर्भावाने विदर्भातील शेतकरी मेटाकुटीला आले. त्यामुळे बोंडअळी व किड्यांच्या नियंत्रणासाठी लाइट ट्रॅपचा उपयोग व्हावा म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सौरऊर्जेवरील ट्रॅप विकसित केले. मात्र, त्याचे दर बाजारात उपलब्ध किमतीपेक्षा अधिक असल्याने महागडा लाइट ट्रॅप चांदा ते बांदा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माथी मारला जात आहे.
बोंडअळी व इतर कीटकांपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांना बाजारात दोन ते पाच हजार रुपयांपर्यंत लाइट ट्रॅप उपलब्ध आहेत. मात्र, कृषी विद्यापीठाने स्वतः संशोधन करून त्याबाबत इतर चार कंपन्यांशी करार केला. त्यांच्याद्वारे ट्रॅप विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून विदर्भातील शेतकऱ्यांना वितरित केले जात आहे. परंतु त्याची किंमत साडेआठ हजार रुपयांपेक्षा अधिक असल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आवाक्‍याबाहेर आहे. संबंधितांकडून विक्री करण्यासाठी कृषी विभागावर दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे. बोंडअळीवर नियंत्रण मिळवण्याकरिता लाइट ट्रॅप लावण्याचा सल्ला कृषी विभागाकडून दिला होता. त्यामुळे शेतकरी ट्रॅप खरेदी करून कापसाचे पीक वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत. याच धर्तीवर कृषी विद्यापीठाने संशोधनाद्वारे तंत्रज्ञान विकसित करून चार कंपन्यांकडे सुपूर्द केले. या कंपन्यांनी यावर्षी हे सोलर लाइट ट्रॅप काही शेतकऱ्यांना वितरित केले. पाच वॉटचा बल्ब दोन एकर परिसरातील कीटकाला आकर्षित करू शकतो, असा दावा संबंधितांनी केला आहे. ट्रॅपची किंमत जास्त असल्याने सर्वसामान्य शेतकरी कसा खरेदी करणार, असा प्रश्‍न आहे. राज्याच्या कृषी खात्याने चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या सोलर लाइट ट्रॅपची योजना पहिल्या टप्प्यात चंद्रपूर जिल्ह्यात राबविली. यासंदर्भात भद्रावती तालुक्‍यातील मधुकर चौधरी या शेतकऱ्याने जिल्हा प्रशासनाकडे तक्रारही केली आहे.

लाइट ट्रॅप तयार करण्यासाठी विद्यापीठाचे तंत्रज्ञान वापरले. इतर चार कंपन्यांसोबत याबाबत करार केलेला आहे. बाजारात उपलब्ध असलेले ट्रॅप इलेक्‍ट्रिसिटीवर असून हे तंत्रज्ञान सोलरवर तयार केले आहे. त्यामुळे बाजारापेक्षा याचे दर काही प्रमाणात जास्त आहेत. विद्यापीठाचे तंत्रज्ञान बदनाम करण्याचा काही खासगी कंपन्यांचा डाव सुरू आहे.
- श्री. काळपांडे,
अभियंता, कृषी विद्यापीठ.


चांदा ते बांदा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वितरित करण्यात येत असलेले लाइट ट्रॅपचे तंत्रज्ञान विद्यापीठाकडून विकसित केले आहे. तंत्रज्ञान सौरऊर्जेवरील असल्याने ज्या ठिकाणी वीज नाही; तेथेही उपयोगी पडते.
- डॉ. धनराज उंदीरवाडे,
कीटकशास्त्रज्ञ, कृषी विद्यापीठ, अकोला

कापूस या पिकावर वाढणाऱ्या किड्यांच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी घरगुती प्रकाश सापळ्यांचा वापर केल्यास कीड नियंत्रण करणे शक्‍य आहे.
--डॉ. विद्या मानकर, प्
रकल्प संचालक, आत्मा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com