file photo
file photo

शाळा बंदमुळे मजूर पालकांची हातमजुरी बुडाली...मुलांचा करावा लागतो सांभाळ

गोंदिया : सध्या शाळा अनलॉक असल्या; तरी विद्यार्थी घरातच लॉक आहेत. दरम्यान, पाल्य घरीच राहात असल्याने ऐन खरिपाच्या हंगामात मजूर पालकांची चिंता वाढली आहे. पोटापाण्याचा प्रश्‍न मिटविणारा हा हंगाम मुलांच्या देखरेखीकरिता घरीच निघून जात आहे. त्यामुळे उदरनिर्वाहासह वर्षभराची पुंजी जमा कशी करावी, असा प्रश्‍न मजूर पालकांना पडला आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर 22 मार्चपासून देश, राज्यासह जिल्ह्यात लॉकडाउन करण्यात आले आहे. लॉकडाउनच्या या कालावधीत सारा व्यवसाय, कामधंदे ठप्प पडले आहेत. अनेकांचा रोजगार हिरावला आहे. अशातच शाळादेखील बंद आहेत. उन्हाळ्याच्या सुट्यानंतर साधारणतः 26 जून रोजी शाळेची घंटा वाजते. नवागत विद्यार्थी शाळेत दाखल होत असतात. नववधूसारख्या शाळा सजलेल्या असतात. नवगातांचे स्वागत करण्यासाठी शाळा प्रशासन आणि शिक्षण विभाग उत्सुक असतो. परंतु, यंदा हे सारे चित्र दिसेनासे झाले आहे.

शाळेत संक्रमणाचा धोका

विद्यार्थी शाळेत गेले तर, संक्रमणाचा धोका अधिक असल्याचे पाहून राज्य शासनाने ऑनलाइन शिक्षण प्रणाली अमलात आणली. परंतु, या प्रणालीचा उपयोग फक्त ऍण्ड्राइड मोबाईल फोन वापरणाऱ्या पालकांच्या पाल्यांना होऊ लागला आहे. आजही जिल्ह्यात कित्येकांकडे स्मार्ट मोबाईल फोन नाहीत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाचे धडे मजूर पालक आपल्या पाल्यांना देऊ शकत नाही.

मुलांमुळे शेतीच्या कामाला जाता येत नाही

जुलै महिन्यापासून जिल्ह्यातील बहुतांश शाळा सुरू झाल्यात. शिक्षकच शाळांत ठराविक दिवशी जाऊ लागले आहेत. परंतु, संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी विद्यार्थी घरीच बसून आहेत. या विद्यार्थ्यांची सर्व जबाबदारी त्यांच्या पालकांवर आली आहे. लॉकडाउनच्या तीन ते चार महिन्यांच्या या कालावधीत गाठीला बांधलेला पैसा सोडून उदरनिर्वाह करणाऱ्या मजूर पालकांजवळचा पैसा संपलेला आहे. खरीप हंगामावर त्यांची आशा आहे. परंतु, आता पाल्य घरीच राहत असल्याने त्याच्या देखरेखीकरिता कमावत्या कुटुंबप्रमुखाला किंवा एखाद्या सदस्याला घरीच राहावे लागत आहे. त्यामुळे खरिपात कामाची गॅरंटी असलेल्या शेतीच्या कामात त्याला जात येत नाही. परिणामी, वर्षभराची पुंजी आणि उदरनिर्वाहाचा प्रश्‍न कसा सोडवावा, याचीच चिंता मजूर पालकांना आहे.

मुलांसाठी मला घरीच राहावे लागते
मला एक मुलगा व एक मुलगी आहे. दोघेही अंगणवाडीत जात होते. परंतु, आता लॉकडाउन असल्याने अंगणवाडी, शाळा बंद आहेत. मी शेतकरी असल्यामुळे मला शेतात जाणे गरजेचे आहे. मात्र, मुलांचा सांभाळ करण्यासाठी मला घरीच राहावे लागत आहे.
- धनराज हेमणे, चिखली.

मुलामुलींच्या सांभाळासाठी पत्नीही घरीच
सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी रोवणीची कामे सुरू केली आहेत. या कामावर जाण्याची पत्नीची इच्छा आहे. मात्र, मुला-मुलींचा सांभाळ करण्यासाठी तिला घरीच राहावे लागत आहे.
- विलू बडोले, कोदामेडी.


संपादन - दुलीराम रहांगडाले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com