पतंजलीचा संत्रा ज्यूस मार्चमध्ये चाखायला मिळणार

File photo
File photo

पतंजलीचा संत्रा ज्यूस मार्चमध्ये चाखायला मिळणार
नागपूर : मिहानमधील रामदेवबाबा यांच्या पतंजली फूडपार्कमधील संत्रा ज्यूससह तीन युनिट मार्चमध्ये सुरू होणार आहेत. 800 टन संत्रा ज्यूस आणि 600 टन भारतीय हिरव्या पालेभाज्यांवर येथे प्रक्रिया केली जाणार आहे. विशेष म्हणजे रामदेवबाबा यांनी भूमिपूजनाप्रसंगी 18 महिन्यांत प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली होती. ती मात्र फोल ठरली आहे.
मिहान प्रकल्पातील पतंजली फूडपार्कचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. विशेष आर्थिक क्षेत्राबाहेरील 234 एकरांवरील फूड पार्कचे पहिले युनिट मार्च किंवा एप्रिल महिन्यात प्रारंभ होण्याची शक्‍यता सूत्रांनी व्यक्त केली. पहिल्या टप्प्यात संत्रा ज्यूस असे तीन युनिट सुरू होणार आहे. जगातील सर्वांत मोठा फूडपार्क उभा करण्यात येत असताना पतंजली समूह भविष्यात निर्यातदेखील करणार आहे. विशेष म्हणजे निर्यातीचे पहिले युनिट मिहानमधील विशेष आर्थिक क्षेत्रात (सेझ) मध्ये उभे केले जाणार आहे. त्यासाठी 60 एकर जागा घेतली आहे. सेझमधील युनिटचे काम अद्याप सुरू झालेले नसून फक्त संरक्षक भिंतीचे काम करण्यात येत आहे. तो प्रकल्प सुरू होण्यास बराच कालावधी लागणार आहे. मात्र, विशेष आर्थिक क्षेत्राच्या बाहेरील फूडपार्कचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. 15 एकरमध्ये भव्य शेड बांधण्यात येत आहे. त्यात लावण्यासाठी मोठमोठ्या अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशा मशिन्सही आलेल्या आहेत. मार्च-एप्रिल महिन्यात विदर्भातील शेतकऱ्यांच्या संत्राला चांगला भाव मिळावा म्हणून पहिल्या टप्प्यात संत्रा ज्यूसचे उत्पादन करण्यात येणार आहे. त्यानंतर आंबा, आवळा, मोसंबी, डाळिंब आदी फळांचे ज्यूस काढण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात पतंजली फूडपार्कमध्ये 700 ते 800 युवकांना थेट रोजगार मिळण्याची शक्‍यता आहे. तर 1500 पेक्षा अधिक युवकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. "सकाळ'च्या प्रतिनिधीनी भेट दिली तेव्हा कोट्यवधी रुपयांच्या मशिन्स विशेष आर्थिक क्षेत्राबाहेरील प्रकल्पासाठी आलेल्या असल्याचे निदर्शनात आले. यामध्ये 1200 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्यात बांधकाम, मशिनरी आणि जमिनीच्या किमतीचा समावेश आहे. अधिकतम मशीन्स या विदेशातून आयात करण्यात आलेल्या आहेत. या प्रकल्पात देशाअंतर्गत विक्रीसाठी विविध प्रकारचे उत्पादन तयार केले जाणार आहेत. त्यात फ्रूट ज्यूस, भारतीय हिरव्या भाज्या, कॅंडी, मुरब्बा आणि लोणचे, पाचन गोळ्या, गव्हाचा आटा, बिस्कीट, आयुर्वेदिक ज्यूस, जॅम आणि सरबत तयार करण्यात येणार आहे. 800 टन संत्र्याचा ज्यूस, 600 टन भारतीय हिरव्या भाज्यांवर प्रक्रिया करण्याची क्षमता या प्रकल्पाची आहे.  

पतंजली फूडपार्क प्रकल्प मार्च-एप्रिल महिन्यात प्रारंभ होईल. यामुळे नागपूर आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडून संत्र्यासह इतरही माल खरेदी करणार आहे. शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रकल्पात पाच हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.
- दीपक जोशी, प्रसिद्धी अधिकारी, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी  

आकडे बोलतात
9 सप्टेंबर 2016 ला प्रकल्पाचे भूमिपूजन
प्रकल्प 234 एकर परिसरात
गुंतवणूक 1200 कोटी
रोजगार 500

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com