आमगाव (जि. गोंदिया) : तालुक्यातील आसोली येथे झालेल्या अग्नितांडवात एकाच कुटुंबातील मात्र वेगवेगळे राहणाऱ्या चार जणांचे तीन गोठे व एक घर जळून खाक झाले. ही घटना शुक्रवारी (ता. 8) पहाटे अडीचच्या सुमारास घडली. यात चार शेतकऱ्यांचे एकूण 8 लाख 40 हजारांचे नुकसान झाले.
या आगीत धोंडूजी बाबूलाल हरिणखेडे यांचे घर, नगदी 1 लाख 20 हजार रुपये, 2 लाख रुपयांचे सोने, जीवनावश्यक साहित्य जळाले. यात त्यांचे 3 लाख 35 हजार रुपयांचे नुकसान झाले. राधेश्याम धोंडूजी हरिणखेडे यांचा गोठा, जनावरांचा चारा, शेतीपयोगी अवजारे, बियाणे, कोंबडी जळून 1 लाख 95 हजार रुपयांचे नुकसान झाले. मेघनाथ धोंडूजी हरिणखेडे यांचा गोठा, कवेलू, जनावरांचा चारा, सायकल, बैलबंडी व अन्य साहित्य जळाले. यात 1 लाख 20 हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच घनश्याम धोंडूजी हरिणखेडे यांचा गोठा, कवेलू, जनावरांचा चारा, शेतीपयोगी अवजारे जळून 1 लाख 90 हजार रुपयांचे नुकसान झाले.
गाढ झोपेत असताना हरिणखेडे यांच्या घराच्या दिशेने आगीच्या ज्वाळा दिसल्याने काही गावकरी जागे झाले. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहितीही अग्निशमन दलाला दिली होती. परंतु, अग्निशमन दल उशिरा घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत तीन गोठे आणि घराची राखरांगोळी झाली होती.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग, तलाठी व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. आमगाव पोलिस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
आसोली येथील धोंडूजी हरिणखेडे यांच्या घर व गोठ्याला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले. दरम्यान, आमदार सहसराम कोरोटे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.