तलावांचे अस्तित्व नष्ट होण्याची काय आहेत कारणे वाचा

Excavation.jpg
Excavation.jpg

भंडारा : तलावांच्या पर्यावरणावर इतर जैवविविधतेतील इतर घटक निर्भर असतात. पण, तलावातील पर्यावरणच खराब असेल तर हे घटक पाठ फिरवितात. तलावाचा जिल्हा असलेल्या भंडारा जिल्ह्यात अशी परिस्थिती उद्‌भवलेली आहे. अवैधरित्या मुरूम उत्खननामुळे तलावातील जैवविविधता नष्ट होत आहे. परिणामी, तलावांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. 14 तलाव विद्रुपीकरणाच्या प्रकरणात शासकीय नियमांचे पायमल्ली केल्याचे चौकशीअंती निदर्शनास आले असले तरी प्रशासन झोपेत असल्याने तलावांच्या संवर्धनाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यामुळे पर्यावरणप्रेमी व शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.


भंडाराची ओळख तलावांचा जिल्हा म्हणून आहे. जिल्ह्यात काही दशंकापूर्वीचे 1,434 तलाव आहेत. मात्र, अतिक्रमणामुळे अनेक तलावांचे अस्तित्व कागदोपत्री राहिले आहे. तलावांमुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होते. यामुळे शेतकऱ्यांसाठी तलावाची आवश्‍यकता आहे. मात्र, प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांसाठी तलाव भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे.मागील अनेक वर्षांपासून तलावांचे खोलीकरण करण्यात न आल्याने केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी तलावातील मुरूम वापरण्यास मुभा दिली. मात्र, कंत्राटदारांनी अवैधरित्या परवानापेक्षा अधिक मुरमाचे उत्खनन करून तलावांचे विद्रुपीकरण करण्याचा सपाटा लावला आहे.

भंडारा व पवनी तालुक्‍यातील 16 तलावातील मुरूम उत्खननास जिल्हा परिषद जलसंधारण विभागाच्या मंजुरीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली. यात कंत्राटदारांनी शासकीय नियमांची पायमल्ली करीत तलावातील मुरमाचे उत्खनन केल्याने तलाव नष्ट होण्याची स्थिती निर्माण झाली. यासंदर्भात तक्रार केल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाला जाग आली. यात 16 पैकी 14 तलावांतील मुरमाचे उत्खनन क्षमतेपेक्षा अधिक केल्याने तलावाचे विद्रुपीकरण करण्यात आल्याचे सिद्ध झाले.

यामुळे तलावाच्या अस्तित्वावर धोका निर्माण झाल्याचे चौकशी अहवालात नमूद केले आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्यापही कुणावरही कारवाई करण्यात आली नाही.
जिल्ह्यात सर्वांधिक तलाव असलेतरी सद्यस्थितीत तलाव केवळ कागदोपत्री राहिले आहेत. यामुळे तलावांचे अस्तित्व टिकविण्याची गरज आहे.

तलाव नष्ट होण्यामागील कारणे
मामा मालगुजारी, शासकीय तलाव आहेत. या तलावांचे सिंचन मालकांपुरतेच होते. यातील मासेमारी मालकांपुरतीच होती. मात्र, अतिक्रमणामुळे अनेक तलावांचे जागा शेतीने घेतली आहे. याशिवाय प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे अनेक तलाव शेवटीची घटका मोजत आहे. जिल्ह्यातील तलावांचे मागील अनेक वर्षांपासून खोलीकरण करण्यात आले नाही. याशिवाय दुरुस्तीचे काम करण्यात न आल्याने पाणीसाठा राहत नाही. परिणामी, सिंचनाच्या सोयीपासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे.

जैवविविधता नष्ट
तलावांची संख्या रोडावत असल्याने विदेशी पक्ष्यांचे आवागमन कमी झाले आहे. तलावाच्या पर्यावरणावर जैवविविधता अवलंबून असते. मात्र, तलावांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. एकेकाळी विदेशी पक्ष्यांचे माहेरघर असलेल्या जिल्ह्यात आता पर्यावरणप्रेमींना प्रतीक्षा करावी लागते. यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com