यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून वेगवेगळ्या भागात अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यांचा तांडव सुरू आहे. रविवारी (ता.10) शहरासह जिल्ह्यातील अनेक भागाला वादळीवाऱ्यासह आलेल्या पावसाचा तडाखा बसला. कळंब तालुक्यात चार हेक्टर केळीच्या बागीचे नुकसान झाले असून जिल्हाभरात 48 घराचे पडझड झाली आहे. वणी तालुक्यातील सावंगी येथे वीज पडून एका बैलाचा मृत्यू झाला आहे. पुसद तालुक्यातील निंबी कवडीपूर भागात तुरळक गारपीट झाली. त्यामध्ये भाजीपाला, टरबूज पिकाचे नुकसान झाले.
वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे कबंरडे मोडले. शिवाय, अनेक घरांवरील टिनपत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. शहरातील अनेक भागालाही वादळी वाऱ्यांचा फटका बसला. बाभूळगाव तालुक्यात वादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. 23 घरांची पडझड झाली असून, अंगावर झाड पडल्याने दोन जण जखमी झाले आहेत. झाडे कोसळल्याने शहरातील अंर्तगत रस्ते बंद झाले होते. महामार्गावर मोठ मोठ वृक्ष कोसळले होते. काही झाड महावितरणच्या वीज वाहिनीवर पडल्याने वीज वाहिन्याचे नुकसान झाले. त्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. शहरासह ग्रामीण भागातही रात्री वीजपुरवठा बंद होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरा पर्यंत "ऑन स्पॉट' राहत वीजपुरवठा सुरळीत केला. काही भागातील वीजपुरवठा पहाटे सुरू झाला. यामुळे नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली.
गेल्या आठवड्यात पुसदमध्ये तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअसपर्यंत चढल्याने उष्म्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. रविवारी झालेल्या वादळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून,, उष्म्यापासून थोडा दिलासा मिळाला आहे. रविवारी रात्री नऊच्या दरम्यान आभाळात विजांचा गडगडाट होऊ लागला. वादळ वाऱ्याचा वेग एकदम वाढला. त्यासोबतच गारांसह पावसाचे आगमन झाले. वादळामुळे अनेक झाडे कोलमडून पडली. काही घरांवरील टीनपत्रे उडून गेली. निंबी, पार्डी, कवडीपूर या भाजीपाल्याच्या पट्ट्यात गारपीट झाल्याने भाजीपाला पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले. शिवाय टरबूज पिकालाही गारांमुळे मार बसला. स्वीट कॉर्न तसेच भाजीपाला रोपांचे नुकसान झाले.
निंबी येथील शेतकरी शिवराम शेटे यांचे रोपवाटिकेच्या वादळामुळे शेडनेटचे थोडे नुकसान झाले. या भागात भुईमूग पीक काढणीला आले असून वादळी पावसाने या पिकाचे नुकसान झाले नाही. ज्वारी चिकावर तर काही दाण्यावर आलेली आहे. या ज्वारी पिकाला मात्र पावसामुळे फायदा झाला आहे. तालुका कृषी विभागाच्या वतीने नुकसानग्रस्त शेत पिकांची पाहणी करून आढावा घेण्यात येत आहे. वीज गुल झाल्यामुळे नागरिकांची झोप उडाली. बराच काळपर्यंत वीजपुरवठा खंडित झालेला होता. रात्री उशिरा हा पुरवठा सुरू केल्यानंतर एकदम विजेचा दाब वाढल्यामुळे नवीन पुसदमधील अनेक नागरिकांची विजेची उपकरणे निकामी झाली आहे. अनेक ग्राहकांचे फ्रिज, एसी ,कुलर ,पंखे नादुरुस्त झाले. त्यामुळे ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसला.
शहरीभागात वादळी वाऱ्यांचा मोठा तडाखा बसला आहे. रस्त्यालगत असलेल्या दुकानांचे नुकसान झाले असून, स्थानिक दाते कॉलेज चौक, दारव्हा-यवतमाळ मार्गावर झाड मार्गावर कोसळली आहे. काही भागात नागरिकांनी तर काही भागात पालिका कर्मचाऱ्यांनी रस्ते मोकळे करून दिले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.