महिलांच्या जिद्दीला सलाम; अमरावतीच्या खादी राख्यांना मुंबईतून मागणी 

file photo
file photo

अमरावती :  मनात ठरविले तर काहीही करता येते. कोणतेही संकट मोठे नसते. तुमची इच्छाशक्‍ती मोठी असावी लागते. हेच त्या महिलांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या कर्तृत्वासमोर गगनही ठेगंणे झाले. एकीकडे कोरोना व लॉकडाउन संपल्यानंतर उद्योग, व्यवसायांची गाडी अद्यापही रुळावर आलेली नसताना अमरावतीकर महिलांनी मात्र आपली जिद्द तसेच कल्पकतेने विपरीत परिस्थितीवर मात करीत खादीपासून राख्या तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. विशेष म्हणजे आतापासूनच मुंबई, पुणे सारख्या महानगरांपासून ते नागपूर व अमरावतीच्या व्यापाऱ्यांकडून खादीच्या राख्यांच्या ऑनलाइन ऑर्डर्स नोंदविण्यात येत आहेत. 

खादीपासून आकर्षक राख्यांची निर्मिती 
केंद्र सरकारच्या मिशन सोलर चरखा अंतर्गत खादी व ग्रामोद्योग महामंडळाच्या मार्गदर्शनात या प्रकल्पाचे कार्यान्वयन कस्तुरबा सोलर खादी महिला समिती करीत आहे. कोरोना तसेच लॉकडाउनच्या काळात उद्योग, व्यवसायांना घरघर लागली. आता लॉकडाउन संपले असले तरी अद्यापही व्यवसायांना उभारी आलेली नाही. त्यामुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत, मात्र या नकारात्मक परिस्थितीचा बाऊ न करता अमरावती जिल्ह्यातील जवळपास 300 महिलांच्या समूहाने सध्याच्या स्थितीत सर्वाधिक मागणी असणारे खादीचे मास्क तसेच पुढील महिन्यात येऊ घातलेल्या राखी पौर्णिमेसाठी नियोजन केले. त्या अंतर्गत कुठल्याही डिझायनर्सच्या मदतीविना महिलांनी घरीच राहून आपल्या कल्पकतेचे आकर्षक राख्यांची निर्मिती खादीपासून केलेली आहे. विशेष म्हणजे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांपासून कापूस विकत घेऊन त्यावर स्थानिक एमआयडीसीमधील प्रकल्पामध्ये प्रक्रिया करीत आकर्षक राख्यांची निर्मिती होत आहे. एका गटाकडून दररोज खादीपासून किमान 200 ते 250 राख्यांची निर्मिती केली जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार स्वदेशी वस्तूंवर भारतीयांकडून भर दिला जात आहे, त्यातच नागरिकांनी चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकल्याने स्वदेशी वस्तूंच्या मागणीत वाढ होत आहे. त्याचाच परिपाक म्हणून मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर सारख्या महानगरांमध्ये खादीपासून निर्मित राख्यांची मागणी वाढली आहे. प्रदीप चेचरे यांच्या मार्गदर्शनात समितीच्या अध्यक्ष रूपाली खडसे, सचिव प्रणिता किडीले, कल्पना शेंडोकार, मंजू ठाकरे, वर्षा चौधरी, वर्षा जाधव, विमल बिलगये, वैशाली राजुरिया, भाग्यश्री मोहिते आदींसह अन्य महिला या प्रकल्पासाठी परिश्रम घेताहेत. 

कल्पकतेची जोड 
तयार करण्यात आलेल्या राख्या तीन श्रेणींमध्ये असून त्यामध्ये प्रीमियम, बेसिक व देवराख्या असे प्रकार आहेत. प्रीमियम राख्यांची सुरुवात 60-70 रुपयांपासून तर बेसिक राख्यांची किंमत 40 ते 60 रुपये डझनांपासून ठेवण्यात आलेली आहे. या सर्व राख्यांचे डिझाइन्स या प्रकल्पातील महिलांनी आपल्या कल्पकतकेची जोड देऊन तयार केले आहे. 

अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कापसावर प्रक्रिया करून खादीच्या राख्या तयार करण्यात येत आहेत. या माध्यमातून महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे तसेच शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळणार आहे. याचा विचार करून नागरिकांनी, संस्थांनी खादीच्या राख्या खरेदी करण्याबाबत उत्साह दाखवावा. 
-प्रदीप चेचरे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, अमरावती. 

-संपादन :  चंद्रशेखर महाजन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com