
यवतमाळ : राज्य सरकारने एकीकडे शाळा सुरू केल्या आहेत, तर दुसरीकडे वसतिगृह बंद करून ठेवली आहेत. आता तर कुठलेच नियोजन न करता दहावी व बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या समस्यांचा निपटारा करावा त्यानंतरच परीक्षेची तयारी करावी, अशी मागणी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष साहेबराव पवार यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन गुरुवारी (ता.10) जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.
दहावीच्या मे महिन्यात तर बारावीच्या एप्रिलमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहेत. दुसरीकडे शहरातील सर्व वसतिगृह अजूनही बंद करून ठेवली आहेत. ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी हे शहरातील वसतिगृहात राहून अभ्यास करतात. कोरोनामुळे वसतिगृह उघडण्याचे आदेश आलेले नाहीत. त्यामुळे शाळा, कॉलेज सुरू होऊनही विद्यार्थ्यांची उपस्थिती नगण्य आहे. कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असल्याने नागरिक आपल्या खोल्या किरायाने द्यायला तयार नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
अशा गंभीर परिस्थितीत विद्यार्थी शिक्षण कसे घेतील, असा प्रश्न शिक्षक भारतीने उपस्थित केला आहे. सध्या फक्त लांब पल्ल्याच्या बसेस सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत व कॉलेजमध्ये जाण्यास अडचण निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थी हे शेतकऱ्यांची मुले आहेत.
यावर्षी कापूस, सोयाबिनसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे मुले शहरात राहण्यापासून तर प्रवासासाठी अधिकचा पैसा खर्च करू शकत नाहीत, याकडेही शिक्षक भारतीने निवेदनातून लक्ष वेधले आहे.
ग्रामीण भागात संगणक व नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्याने विद्यार्थी ऑनलाइन अभ्यास करू शकले नाहीत. आता वसतिगृह व प्रवासाची समस्या असल्याने शाळेत पन्नास टक्क्यांपेक्षा कमी उपस्थिती आहे. अशातच परीक्षेसाठी ठरविण्यात आलेला सिलॅबस विद्यार्थ्यांना शिकविणे कठीण झाले आहे. सरकारने प्रथम विद्यार्थ्यांची समस्या निकाली काढावी, त्यानंतरच परीक्षेची तयारी करावी.
- साहेबराव पवार,
जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती, यवतमाळ.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.