गडचिरोलीत उर्वरित 150 ग्रामपंचायतींत झालं मतदान; नक्षलग्रस्त भागातही दिसली शांतता 

Second round of Elections done in Gadchiroli Latest News
Second round of Elections done in Gadchiroli Latest News

गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला टप्पा शुक्रवारी पार पडल्यानंतर आता दुसरा टप्प्यात बुधवारी (ता. 20) शांततेतच पार पडला. बुधवारी जिल्ह्याच्या सहा तालुक्‍यांतील उर्वरित 150 ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष मतदान झाले.

बुधवारी जिल्ह्यातील चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या सहा तालुक्‍यांतील 486 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. या सहा तालुक्‍यांतील 150 ग्रामपंचायतींमधे 2 लाख 49 हजार 638 मतदार आहेत. यामध्ये महिला 1 लाख 21 हजार 8955 तर पुरुष 1 लाख 27 हजार 741 आहेत. निवडणुकीसाठी 486 प्रभागांमधून 1170 जागांसाठी 2815 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाकडून 2166 कर्मचारी व अधिकारी नियुक्त करण्यात आले. 

हे सर्व कर्मचारी 486 मतदान केंद्रांवर आवश्‍यक साहित्य घेऊन पोहोचत आहेत. तालुकानिहाय मतदार आकडेवारीनुसार चामोर्शी तालुक्‍यात एकूण ग्रामपंचायती 65 असून मतदान केंद्रे 209 तर, मतदार 106154 आहेत. मुलचेरा तालुक्‍यात एकूण ग्रामपंचायती 14, मतदान केंद्रे 48, मतदार 31627, अहेरी तालुक्‍यात एकूण ग्रामपंचायती 28, मतदान केंद्रे 96 व मतदार 53691 आहेत. 

एटापल्ली तालुक्‍यात एकूण ग्रामपंचायती 14, मतदान केंद्रे 46, मतदार 21939, भामरागड तालुक्‍यात एकूण ग्रामपंचायती 2 मतदान केंद्रे 6, मतदार 2320, सिरोंचा तालुक्‍यात एकूण ग्रामपंचायती 27, मतदान केंद्रे 81 व मतदार 33907 आहेत. यापूर्वीच्या पहिल्या टप्प्यात गडचिरोली जिल्ह्यातील 6 तालुक्‍यांतील मतदान शुक्रवार (ता. 15) घेण्यात आले. या सहा तालुक्‍यांतील प्रत्यक्ष मतदान झालेल्या 170 ग्रामपंचायतींमध्ये अंदाजित 82.18 टक्‍के मतदान झाले आहे. 

या मतदानात कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली व धानोरा या तालुक्‍यांतील 170 ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष निवडणुका झाल्या. बुधवारी उर्वरित सहा तालुक्‍यांतील ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडले. सकाळपासूनच अनेक ठिकाणी नागरिकांनी मतदानासाठी गर्दी केली होती. निवडणूक कर्मचाऱ्यांच्या देखरेखीत शिस्तीत मतदान पार पडले.

नक्षलवाद्यांची माघार

ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला टप्पा नक्षलवाद्यांच्या लुडबुडीशिवाय शांततेत पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्याबद्दल मनात धाकधूक होती. पण, या दुसऱ्या टप्प्यातही नक्षलवाद्यांनी आपले कुठल्याही प्रकारचे अस्तित्व दाखवले नाही. विशेष म्हणजे भामरागडसारख्या नक्षलदृष्ट्या संवेदनशील असलेल्या तालुक्‍यातील अतिदुर्गम अशा मल्लमपोडूर गट ग्रामपंचायतीची निवडणूकही निर्धोक पार पडली. येथे 52. 53 टक्‍के मतदानाची नोंद झाली. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीतून नक्षलवाद्यांनी माघारच घेतल्याचे दिसून येत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com