अमरावती : त्यांनी असे काय कर्तृत्व गाजवले ज्याच्या भरोशावर ते ४०० पार जागा जिंकतील, असा भाजपवर सवाल करीत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडी ३५ प्लस राहील, असा दावा केला. संकटात विदर्भाने नेहमीच साथ दिल्याचा उल्लेख करीत सर्व दहा जागाही महाविकास आघाडी जिंकेल, असाही दावा त्यांनी केला.
महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या समर्थनार्थ लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी गुरुवारी अमरावती येथे पत्रकारांसोबत संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बळवंत वानखडे यांच्यासह आमदार अॅड. यशोमती ठाकूर, माजी खासदार अनंत गुढे, सहसंपर्क नेते सुधीर सूर्यवंशी, काँग्रेसचे प्रवक्ते अॅड. दिलीप एडतकर यावेळी उपस्थित होते.
राऊत म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत भाजप सरकारने देशातील लोकशाही नष्ट केली. लोकांना गुलाम केले. या दहा वर्षात त्यांनी असे काय कर्तृत्व गाजवले ज्यामुळे त्यांना चारशे पार जागा मिळणार आहेत ते त्यांनी देशवासीयांना सांगितले पाहिजे. गेल्या दोन पंचवार्षिकमध्ये भाजपने सत्ता मिळवली असली तरी तिसऱ्या वेळी मात्र ती मिळणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या मोदी गॅरंटीवर टीकास्त्र सोडत ते म्हणाले, यावेळी भाजप व मोदींनाच वाराणसीमधून निवडून येण्याची गॅरंटी नाही, त्यांनी तेथून निवडून येऊन दाखवावे. यावेळी नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत, ही आमची गॅरंटी आहे. कोरोना काळात त्यांनी थाळ्या वाजवून व मेणबत्या पेटवून गो कोरोनाचा नारा दिला होता. यावेळी लोकांनी गो मोदीचा नारा देण्याची तयारी केली आहे. बीफ कंपन्यांकडून ५५० कोटी रुपयांचे इलेक्ट्रॉल बाँड घेणाऱ्या भाजपला लोकं निवडून देणार नाहीत.
देशात भाजपला १५० हून अधिक जागा मिळणार नसल्याचा दावा करीत ते म्हणाले, महाराष्ट्रासह कर्नाटक, पश्चिम बंगाल, दिल्ली, हरयाना या राज्यांमध्ये इंडिया आघाडीला बहूमत मिळणार असून ही राज्ये सत्ताबदलाची क्षमता राखणारे आहेत. महाराष्ट्रावर सर्वांचे लक्ष लागले असून देवेंद्र फडणवीस यांनी कितीही ४५ प्लसची भाषा केली तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३५ प्लस जागा मिळणार असून यामध्ये सर्वाधिक वाटा विदर्भाचा असणार आहे. संकटात असताना विदर्भाने नेहमी मदत केली आहे. येथील दहाही जागा महाविकास आघाडी जिंकेल, असा दावा त्यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांचा देशातील सर्वांत खोटारडा नेता असा उल्लेख करीत ते म्हणाले वापरा अन् गिळा, अशी भाजपची नीती आहे. त्याचा प्रत्यय लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचे आताचे मित्र घेत आहेत. हनुमान चालीसा पठणावर बंधन नसून मातोश्रीसमोरच त्याचे पठण करण्याचे चॅलेंज करणे त्यांना महागात पडल्याचे राऊत यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावरील कारवाईसंदर्भातील प्रश्नादाखल सांगितले.
शिवसेनेचे (उबाठा) दिनेश बूब यांनी दाखल केलेल्या उमेदवारीसंदर्भात बोलताना ते म्हणाले बूब यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. मात्र त्यांनी निवडणूक लढवू नये, असा आपला सल्ला आहे. बारामतीमधून खासदार सुप्रिया सुळे विक्रमी मतांनी विजयी होतील, असाही दावा त्यांनी यावेळी व्यक्त केला. वंचितचे अॅड. प्रकाश आंबेडकर हे मित्र असून यावेळी नाही तर पुढील वेळी ते आमच्यासोबत येतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.