अमरावती शहरात सर्वत्र शुकशुकाट...नागरिकांमध्ये दहशत... काय आहे कारण

file photo
file photo

अमरावती : कोरोना व्हायरस कोविड-19ची वाढती रुग्णसंख्या पाहता जिल्हा प्रशासनाकडून शहरात जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला. शुक्रवारी (ता. 10) सायंकाळपासून शहरातील बाजारपेठा बंद करण्यात आल्या. या दरम्यान शनिवारी (ता. 11) शहरातील रस्ते आणि बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यात आल्या होत्या. शनिवारी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांनाही पोलिसांनी परत पाठविले. सोमवारी (ता. 13) सकाळपर्यंत हा कर्फ्यू राहणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

विशेष म्हणजे, एकाच आठवड्यात तब्बल 150 कोरोना रुग्णांची वाढ झाल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. राज्य शासनाने अनलॉक जाहीर केल्यापासून शहरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. रस्ते तसेच बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या आहेत; तर रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. वाढती चिंताजनक रुग्णसंख्या पाहता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शुक्रवार (ता. 10) सायंकाळपासून ते सोमवारी (ता. 13) सकाळपर्यंत जनता कर्फ्यूची घोषणा केली होती.

शनिवारी सर्वत्र शुकशुकाट

त्यानुसार शनिवारी शहरात सर्वत्र सन्नाटा पसरला होता. शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या राजकमल चौक, श्‍याम चौक, राजापेठ, इर्विन परिसर, इतवारा बाजार, जयस्तंभ चौक, चित्रा चौक आदींसह अन्य भागात सर्वत्र शुकशुकाट होता. विशेष म्हणजे शहरात मागील सात दिवसांत जवळपास 150 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने नागरिकांसह प्रशासन हादरून गेले आहे.

तरीही नागरिक पडले घराबाहेर

शहरात जनता कर्फ्यू असला; तरी अनेक नागरिकांना मॉर्निंग वॉकचा मोह आवरता आला नाही. मुख्य रस्त्यांसह उड्डाणपूल, एमआयडीसी रोड, छत्री तलाव परिसर तसेच अन्य परिसरात मॉर्निंग वॉककरिता घराबाहेर पडलेल्यांना पोलिसांनी परत पाठविले.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com