पिण्याला थेंबही नाही...माळपठार पाणीपुरवठा योजना 'लॉकडाऊन'मुळे कागदावरच

tanker
tanker

पुसद (जि. यवतमाळ) : पुसद तालुक्‍यातील पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या माळपठारावरील 40 गावांची तहान भागविणारी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना एक वर्षापासून बंद आहे.
उन्हाळ्याआधी या योजनेच्या दुरुस्तीसाठी 1.63 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. मात्र, "लॉकडाऊन'मुळे निविदाप्रक्रिया रखडल्याने मे महिन्याच्या कडक उन्हात माळपठारवासींची तीव्र पाणीटंचाईत तहान कशी भागवणार? असा प्रश्‍न प्रशासनाला पडला आहे.
जगभर कोरोनाचा थयथयाट सुरू असताना पुसद तालुक्‍यातील माळपठार मात्र तीव्र पाणीटंचाईने त्रस्त झाले आहे.'पाणी म्हणजे जीवन' या वाक्‍प्रचाराचा खरा अर्थ माळपठारावर कळतो. अनेक पिढ्या पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकताना गारद झाल्या.
माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी या प्रश्‍नावर अखेर मार्ग काढला व 40 गाव माळपठार प्रादेशिक पाणीपुरवठा योजना 2005 मध्ये कार्यान्वित केली. इसापूर धरणाच्या जलाशयातून या योजनेचा स्रोत आहे. काही काळ ही योजना पूर्ण क्षमतेने चालविण्यात आली. लोक खुश झालेत. जलजन्य आजार दूर पळाले. परंतु योजनेच्या चुकीच्या आराखड्यामुळे शेवटच्या गावापर्यंत पुरेसे पाणी पोहोचविण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.                                                                            या योजनेची इसापूर धरणाच्या मोप गावच्या पैनगंगेच्या काठावर जॅकवेल घेण्यात आली. धरणातील पाणीसाठा कमी झाला की, या जॅकवेलमधून पाणी मिळणे कठीण हाेते. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात या योजनेने माळपठाराच्या तोंडचे पाणी पळविले. ही त्रुटी दूर करण्यासाठी काही स्वतंत्र गावांसाठी पूरक पाणीपुरवठा योजना सुरू केली. पाण्याचे भरपूर स्रोत असलेले जलाशयाचे ठिकाण निवडण्यात आले. परंतु पुरेसे यश मिळाले नाही. या योजनेला पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ झाल्याने पाणी खेचणारे विद्युतपंप व जलवाहिनी निकामी ठरली. या योजनेच्या पुनरुज्जीवनासाठी जुने वीजपंप बदलून नवीन यंत्रे आणण्यासाठी 1.63 कोटी रुपयांची योजना तयार करण्यात आली. लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यानंतर उन्हाळ्यापूर्वी या योजनेला हिरवी झेंडी मिळाली. ही योजना पूर्ण क्षमतेने एप्रिल महिन्यात सुरू करण्याचे 'टार्गेट' ठेवण्यात आले. परंतु निविदाप्रक्रियेला उशीर होत मार्च महिना उजाडला आणि त्यातच कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. एकच निविदा आल्याने फेरनिविदा काढण्यात आली. एकूणच माळपठारवासीयांना उन्हाळ्यात मुबलक पाणी देण्याचे स्वप्न भंगले.   

सविस्तर वाचा - शौकिनांनो सावधान! बनावट तंबाखू खाणे उठू शकतेजीवावर                                                                                         योजना सध्या निविदा प्रक्रियेत असून किमान मे महिन्याच्या अखेरपर्यंत तरी पिण्याचे पाणी मिळण्याची शक्‍यता नाही, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभागीय अभियंता शेषराव दारव्हेकर यांनी 'सकाळ'ला सांगितले. सध्या माळपठारावरील प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न पेटला आहे. केवळ तीन गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु येत्या काही दिवसात टँकरची संख्या वाढविण्याशिवाय पर्याय उरणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com