लॉकडाउनमध्ये शेतकऱ्यांना महाबीजने दिला दणका; ऐनवेळी घेतला हा महत्त्वपूर्ण निर्णय

mahabeej in akola.jpg
mahabeej in akola.jpg

अकोला : खरिपात झालेल्या पावसामुळे यंदा सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन बियाण्याचीही प्रत खालावली होती. याची झळ आता आगामी हंगामाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना झेलावी लागत आहे. सोयाबीनचे बियाणे क्विंटलला एक हजार रुपयांपेक्षा अधिक महागले आहे.

प्रामुख्याने महाबीजच्या बियाण्याचा दर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. सोयाबीनची 30 किलोची एक बॅग मागील हंगामात 1890 रुपयांपर्यंत विकली जात होती. यंदा या बॅगची किमत 360 रुपयांनी वाढविली आहे. उत्पादन खर्च वाढल्याने ही दरवाढ केल्याचे सांगितले जात आहे.

राज्यात सोयाबीन हे प्रमुख पीक झालेले आहे. राज्यात जवळपास 39 लाख हेक्टरपेक्षा अधिक सोयाबीन क्षेत्र आहे. यासाठी लाखो क्विंटल बियाण्याची गरज लागते. सोयाबीन हे स्वपरागसिंचीत असल्याने दरवर्षी नवीन बियाणे विकत घेण्याची गरज नसली तरी महाराष्ट्रात सोयाबीनचे बियाणे 30 ते 40 टक्क्यांदरम्यान नव्याने खरेदी होत असते. यामुळे हंगामात दरवर्षी लाखो क्विंटल सोयाबीनची विक्री होते. या बियाणे पुरवठ्यात प्रामुख्याने महाबीजचा वाटा मोठा असतो.

हंगामात सोयाबीनच्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठी झळ सहन करावी लागली. असाच फटका बिजोत्पादनालाही बसला. बियाणे कंपन्यांना हंगामासाठी दर्जेदार बियाणे उपलब्ध करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. साहजिकच उत्पादन खर्चात यंदा वाढ झाली. यामुळे बियाणे उत्पादक कंपन्यांनी आता दरवाढ करीत शेतकऱ्यांना झळ पोचविली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाबीज बियाण्याच्या 30 किलो वजनाची बॅग 360 रुपयांनी यंदा महागली आहे.

मागील हंगामात 1890 रुपयांना मिळणारी ही बॅग आता 2250 रुपयांपर्यंत पोचली आहे. यंदा किलोला 75 रुपयांचा दर चुकवावा लागणार आहे. तर काही खासगी कंपन्यांचे सोयाबीन बियाणे प्रतिबॅग 2400 रुपये किंवा त्यापेक्षा अधि दराने विक्री केली जात आहे. बियाणे कंपन्यांनी यंदा विक्री दर अनेक दिवसांपर्यंत जाहीर न केल्याने बाजारात गोंधळाची स्थिती बनली होती. महाबीजचे दर अद्यापही ग्रामीण भागात स्पष्टपणे जाहीर झालेले नसल्याने विक्रेत्यांमध्ये संभ्रम आहे.

दरवाढ मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा
शेतकऱ्यांना लागणारे बियाणे, खते महागली आहेत. मागील हंगामात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात होता. मात्र, एव्हढे होऊनही सोयाबीन बियाण्याचा दर वाढविणे चुकीचे आहे. ही दरवाढ तातडीने मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला जावा.
- प्रशांत डिक्कर, विदर्भ अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com