अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतिम वर्ष अंतिम सत्रासह अनुशेषातील विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेशपत्रच मिळालेले नाहीत, तर काहींच्या प्रवेशपत्रात चुकीचे विषय आले आहेत. अशावेळी नेमकी परीक्षा कोणत्या विषयाची द्यायची? हा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकला आहे. सोमवारपासून (ता.१२) विद्यापीठाच्या परीक्षांना सुरुवात होत आहे, हे विशेष.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील अंतिम वर्ष व सत्राची ६७५ हजारांहून अधिक, तर अनुशेषाची धरून सव्वालाखांवर विद्यार्थ्यांनी परीक्षांची तयारी केली आहे. कोरोना संक्रमण व नंतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रखडलेल्या परीक्षा सोमवारपासून सुरू करण्याचे नियोजन विद्यापीठाने केले. त्यासाठी प्रवेशपत्र पाठविण्यात आले. मात्र, त्यात अनेक त्रुटी आढळून आल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मिळाले त्यांच्या विषयांमध्ये चुका आहेत, तर अनेकांना अजूनही प्रवेशपत्रच मिळालेले नाहीत. अनेक विद्यार्थ्यांचे ग्रुप बदलण्यात आले, तर काहींचे माध्यम चार विषयांऐवजी तीनच विषय, तर काहींना पूर्ण विषय देताना परीक्षेच्या माध्यमात बदल करण्यात आला. एकंदरीतच परीक्षेच्या पूर्वप्रक्रियेत गोंधळ निर्माण झाला असल्याने परीक्षा द्यायच्या कशा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षेचे नियोजन करताना त्याची व्यवस्था खासगी यंत्रणेकडे सोपविली. या एजन्सीला डेटा देण्यात आला व त्यानुसार यंत्रणेने कामकाज केले. मात्र, त्यात अक्षम्य त्रुटी राहिल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेच्या तोंडावर मानसिक त्रास सहन करण्याची वेळ आली आहे.
त्रुटी दुरुस्त करणे सुरू -
विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला गोंधळ दूर करण्याचे काम सुरू असून रविवारी सायंकाळपर्यंत सर्व त्रुटी दुरुस्त केल्या जातील, असे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे परीक्षानियंत्रक डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.
संपादन - भाग्यश्री राऊत
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.