
वर्धा : भाव वाढेल या आशेने घरी साठवून ठेवलेले पांढर सोन आता शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने विकावे लागत आहे. कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. खासगीत व्यापारी कापूस प्रतिक्विंटल 3,800 रुपये भावाने खरेदी करीत आहे. अद्यापही शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कापूस आहे. मार्केटमध्ये दररोज शंभरावर गाड्यांची आवक आहे. लॉकडाउनमुळे कापसाचे भाव पडल्याने शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणितच चुकले आहे.
विदर्भातील शेतकरी कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. विदर्भाला पांढऱ्या सोन्याची खाण म्हटले जाते. कापसाच्या पिकावरच शेतकऱ्यांचे वार्षिक गणित अवलंबून असते. दरवर्षी कपाशीचा पेरा अधिक असतो. गत दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना नापिकाची सामना करावा लागतो आहे. गतवर्षी अतिवृष्टीमुळे कापसाच्या पिकाची नासाडी झाली. यंदाही कापसाच्या उत्पादनात घट झाल्याचे शेतकरी सांगत आहे.
यंदा सुरुवातीला कापसाला खुल्या बाजारात 5 हजार 800 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. पुढे भाव वाढतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरीच भरून ठेवला. जानेवारी महिन्यात चीनमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले. परिणामी, जागतिक बाजारपेठेत मंदी आली. भारतात मार्च महिन्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने खबरदारी म्हणून लॉकडाउन करण्यात आले. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात आली. परिणामी, शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली.
शेतकऱ्यांनी घरात साठवून ठेवलेला कापूस काळवंडला. अनेक संघटनांनी कापूस खरेदी केंद्र सुरू करा, अशी मागणी केली. सीसीआय आणि खासगी कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. कापसाची प्रत खालावल्याने सीसीआय तो कापूस खरेदी करायला तयार नाही. तर खासगी व्यापारी कवडीमोल भावाने कापूस खरेदी करीत आहे. सध्या खुल्याबाजारात कापसाचा प्रतिक्विंटल 3,800 रुपयांपासून लिलाव सुरू होता. या भावात शेतकऱ्यांचा लागवडखर्चसुद्धा निघणे कठीण आहे. शासनाने शेतकऱ्यांकडील सर्व प्रतीचा कापूस खरेदी करावा, अशी मागणी होत आहे.
50 हजारांचे नुकसान
माझ्याकडे दहा एकर शेती असून, सात एकरांत कपाशीची लागवड केली होती. एकरी उत्पादन सहा ते सात क्विंटल झाले. 50 क्विंटल कापूस झाला. त्यातील 20 क्विंटल कापूस जानेवारी महिन्यात साडेपाच हजार रुपये क्विंटलने विकला होता. पुढे भाव वाढेल, अशी आशा होती. मात्र, चार हजार रुपये क्विंटलनेच कापूस विकावा लागला. जवळजवळ 50 हजारांचे नुकसान झाले आहे.
- नितीन नाखले,
शेतकरी, बोरगाव
कृषी उत्पन्न बाजार समितीने सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळत शेतमाल खरेदी सुरू केली होती. तर आता कापूस खरेदी सुरू केली आहे. सोमवारी मार्केट यार्डमध्ये शंभराच्यावर गाड्यांची आवक होती. मात्र, कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.