‘वंचित’ सोडून गेले, त्यांना पक्षाने भरभरून दिले; मात्र, त्यांना जाण नाही : अशोक सोनोने

ashok sonone
ashok sonone

खामगाव (जि. बुलडाणा) : विरोधकांच्‍या आमिशाला बळी पडून स्‍वतःचा स्‍वार्थ साधण्यासाठी काहींनी राजीनामे दिले आहेत. मात्र, त्‍याचा संघटना व चळवळीवर कोणताही परिणाम होणार नाही. जे पक्ष सोडून गेले आहेत, त्‍यांना बाळासाहेब आंबेडकरांनी भरभरून दिले आहे. मात्र, त्‍याची जाण त्‍यांनी ठेवली नाही. अशी प्रतिक्रिया भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी ‘सकाळ’ शी बोलतांना दिली आहे.

जि.प. व पं.स. निवडणुकीतही पक्ष विरोधी भूमिका
माजी आमदार बळीराम सिरस्‍कार यांच्‍यासह 48 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्‍यानंतर याविषयावर अशोक सोनोने यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्‍हणाले, ज्‍यांनी पक्षाच्‍या विश्‍वासर्हतेचा मुद्दा उपस्‍थित केला, मुळात तेच किती विश्‍वासू आहेत हे अलीकडेच झालेल्‍या जिल्‍हा परिषद, पंचायत समितीच्‍या निवडणुकीमध्ये सर्वांनी पाहिले. भारिप बहुजन महासंघावर जनतेचा विश्‍वास आहे. म्‍हणूनच अकोला जिल्‍हा परिषदेमध्ये पक्षाला सत्‍ता प्राप्‍त करता आली. जे विश्‍वासार्हतेच्‍या गप्‍पा करीत आहेत. त्‍यांनी पक्षाच्‍या विरोधात काम केल्‍याने जवळपास दहा उमेदवारांचा अल्‍पशा मतांनी पराभव झाला. सामान्‍य कार्यकर्ता असलेल्‍या बळीराम सिरस्‍कार यांना पक्षाने दोन वेळा जिल्‍हा परिषद सदस्‍य, अध्यक्ष, दोन वेळा आमदार, जिल्‍हाध्यक्ष अशी विविध पदे दिली.

‘भदे’ यांचा पुन्हा दगा
हरिदास भदे यांनी यापूर्वी देखील पाठीत खंजीर खूपसून मखाराम पवार यांच्‍यासोबत हातमिळवणी करून काँग्रेसशी घरोबा गेला होता. त्‍यांना पुन्‍हा पक्षात घेतले होते. मात्र, बाळासाहेबांनी दाखवलेल्‍या विश्‍वासाला त्‍यांनी पुन्‍हा दगा देत पक्षविरोधी काम केले. त्‍यामुळे अशा बेईमान लोकांच्‍या जाण्याने संघटनेवर काही परिणाम होणार नाही. उलट राज्‍यासह देशभर बाळासाहेब आंबेडकर यांचे दौरे सुरू असून त्‍यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुठभर लोक गेले असले तरी मोठ्या प्रमाणात जनतेचा पाठिंबा पक्षाला मिळत असून, आगामी काळात पक्ष संघटन आणखी मजबूत होईल, असा विश्‍वासही अशोक सोनोने यांनी व्‍यक्‍त केला.

राज्‍यभर संघटन बांधणी
भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीच्‍या माध्यमातून बहुजनांच्‍या न्‍याय हक्‍कासाठी सातत्‍याने लढा दिल्‍या जात आहे. ही चळवळ आणखी भक्‍कमपणे उभी करायची असून, त्‍यासाठी राज्‍यभर संघटना बांधणी केली जाणार आहे. सर्व धर्माच्‍या युवकांना, नव्‍या चेहऱ्यांना पक्षात काम करण्याची संधी दिली जाणार असून, संघटन बांधणीसाठी राज्‍यभर दौरे करणार असल्‍याचेही प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी सांगितले.

4 मार्च रोजी दिल्‍लीत आंदोलन
वचिंत बहुजन आघाडीच्‍या वतीने येत्‍या 4 मार्च रोजी दिल्‍लीतील जंतरमंतर येथे सीएए, एनआरसी, एपीआर विरोधात धरणे आंदोलन केले जाणार आहे. त्‍यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांचे भारतभर दौरे सुरू असून, लाखो नागरिक या आंदोलनात सहभागी होतील, अशी माहिती अशोक सोनोने यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com