बाप रे बाप! परवानगी पन्नास लोकांची अन् उपस्थिती हजारोंची; यवतमाळमध्ये मंगल कार्यालयं हाउसफुल्ल

weddig
weddig

यवतमाळ : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी परिपत्रके काढून नियमावली घालून दिली आहे. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे गर्दीवर निर्बंध घातले. लग्नसमारंभात गर्दी होते म्हणून केवळ पन्नास जणात लग्न करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. मात्र, जिल्ह्यात या निर्देशाची सर्वत्र पायमल्ली होत आहे. कागदोपत्री परवानगी पन्नासची मिळविली जाते. प्रत्यक्षात उपस्थिती हजारोंची राहत आहे. मंगल कार्यालये खचाखच गर्दीने फुलून जात असल्याचे चित्र सर्वत्र बघावयास मिळत आहे.

सर्वच नियम जनतेच्या भल्यासाठी असतात. मात्र, काही नियमांना जनतेकडून तसेच प्रशासनाकडून सोयीस्कर तिलांजली दिली जात आहे. एखाद्या गोष्टीची जोपर्यंत तक्रार येत नाही, तोपर्यंत कारवाई न करण्याचा चंगच जणू प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बांधला आहे, असे दिसते. मागील वर्षी मे महिन्यात अत्यंत कमी संख्येने लग्न समारंभ पार पडले. यंदा मंगल कार्यालये गर्दीने ओसंडून वाहत आहे. 

कोरोनाचा वाढलेला आकडा जसजसा कमी होत गेला तसतशी लोकांमध्ये भीती कमी होऊन बेशिस्त व बेभानपणे वागण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली. मास्क न बांधणे, सामाजिक अंतर न पाळणे, हात स्वच्छ न धुणे, गर्दी करणे आदी बाबी परत सुरू झाल्याने कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले. बेशिस्त, बेभानपणे वागल्याने अलीकडे रुग्णसंख्या प्रचंड वाढली आहे. त्यासोबतच मृत्यू दरातही चिंताजनक वाढ झाली आहे. 

पन्नास जणांतच लग्न समारंभ व्हावे, असा आदेश शासनाने काढला. मात्र, या आदेशाचे कुठेही पालन होत नसताना दिसत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकाही मंगल कार्यालयाला जास्त संख्या असल्याने दंडित केल्या गेले नाही व कोणत्याही लग्न कर्त्यावर सुतरामही कारवाई केल्या गेली नाही. यामुळे लग्न करणारे व मंगल कार्यालय संचालक निर्भिड झाले आहेत. याचीच परिणती म्हणून मंगल कार्यालय गर्दीने फुलून गेले आहेत. पन्नासच्या ठिकाणी पाचशे ते हजार लोकांची उपस्थिती ही आता सर्वसामान्य बाब झाली आहे. 

अनेक मंगल कार्यालयवाले तुम्ही प्रशासनाची चिंता करू नका, आम्ही पाहून घेतो, असाही आधार लग्नकर्त्याना देत आहेत. जिल्ह्यात श्रीमंत व राजाश्रय असलेल्या लोकांकडेच मंगल कार्यालये आहेत. आमच्या मंगल कार्यालयावर कारवाई करण्याची कुणाची हिंम्मत नाही, हे ते जाणून आहेत. कारवाईसाठी कुणी कर्मचारी-अधिकारी गेल्यास त्यांना धमकावणे किंवा इतरत्रचे उदाहरण देऊन माघारी फिरविण्याचा मार्ग मंगल कार्यालयाच्या मालकांनी अवलंबिला आहे.
.
प्रशासनाचे कागदी घोडे

प्रशासन मात्र नुसते गर्दी करू नका, असे कागदी घोड्याच्या माध्यमातून केवळ आवाहन करताना दिसत आहे. जिल्ह्यातील कोरोना आटोक्‍यात आणायचा असेल तर लग्न समारंभ व मंगल कार्यालयावर कठोर कारवाई करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

आकडेच मोजावे लागतील

नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून कुठे जायचे आणि कुठे नाही, याचा निर्णय गांभीर्यपूर्वक घेतला तरच कोरोनापासून स्वत:सह कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकतो, अन्यथा कोरोना बाधितांसह मृतांचे आकडे मोजण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय शिल्लक राहणार नाही.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com