हळद लागण्यापूर्वीच नियतीने साधला डाव, एकाच खड्ड्याने केला दोन मित्रांचा घात

two died in road accident in gondpipri of chandrapur
two died in road accident in gondpipri of chandrapur

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर ) : तालुक्यातील किरमीरी येथे नातेवाईकाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम होता. यासाठी धाबा येथील दोन मित्र गेले होते. एक मित्र आधी परतला. सध्या हिवरा-किरमीरी या मुख्य मार्गाचे काम सुरू आहे. याठिकाणी पाईपसाठी खड्डा खोदण्यात आला. याठिकाणी एकाचा अपघात झाला. दुसरा मित्र थोडा उशिरा परतला. त्याचाही त्याचठिकाणी अपघात झाला. दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन खास मित्रांवर काळाने डाव साधल्याने गावात शोककळा पसरली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील हिवरा - किरमीरी मार्गावर काल रात्रीच्या सुमारास अपघाताची ही दुर्देवी घटना घडली.

धाबा येथील गोकुळ अंबादास झाडे (वय 30) व नितेश गजानन झाडे (वय 31) हे दोन खास मित्र. काल किरमीरी या गावात एका नातेवाईकाच्या घरी वाढदिवसाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी दोघेही आपआपल्या बाईकने तिथे गेले होते. कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर महत्वाचे काम आल्याने गोकुळ आपल्या बाईकने गावाकडे परतण्यासाठी निघाला. परत येत असताना हिवरा किरमीरी मार्गावर असलेल्या खड्डयात तो पडला. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने चंद्रपुरात दाखल करण्यात आले. तिथून नागपूरला रेफर करण्यात आले. मित्राच्या अपघाताची माहिती कळताच नितेश बाईकने परत येत असताना त्याचाही त्याच खड्डयात अपघात झाला. त्यालाही चंद्रपूरला दाखल करण्यात आले. 

दरम्यान, गोकुळचा नागपुरात, तर नितेशचा चंद्रपुरात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन मित्रांचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याची माहिती कळताच गावात शोककळा पसरली आहे.

फेब्रुवारी महिन्यात होता विवाह -
धाबा येथील जुन्या बेघर वस्तीत नितेश व गोकुळ हे दोघेही मित्र वास्तव्यास होते. नितेशचा साक्षगंधाचा कार्यक्रम नुकताच पार पडला होता. फेब्रुवारी महिन्यात त्याचा विवाह होता. पण त्याआधीच काळाने डाव साधला.

कंपनीबाबत रोष -
सध्या भंगाराम तळोधी किरमीरी हिवरा या मुख्य मार्गाचे काम सुरू आहे. गुरूबक्षिणी कंपनी हे काम करत आहे. किरमीरी व हिवरा या गावांच्या मधोमध मार्गावर आतून पाईप टाकण्यासाठी खड्डा खोदण्यात आला. या खड्डयाच्या बाजूला काम सुरू आहे, असे फलक लावणे आवश्यक होते. पण तिथे कुठलेच सुरक्षाफलक लावण्यात आला नाही. यामुळेच दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. यामुळे आता गावकऱ्यांत कंपनीविषयी कमालीचा रोष निर्माण झाला आहे.

हेही वाचा -

...तर ठाण्यासमोर ठिया -
कंपनीच्या चुकीमुळे गावातील दोन तरुणांचा जीव गेल्याने गावात संतापाची लाट आहे. याप्रकरणी कंपनीच्या ठेकेदारास तातडीने अटक करावी अशी मागणी गावकरी करित आहेत. असे न झाल्यास दोन्ही तरुणांचे प्रेत पोलीस ठाण्यासमोर ठेउन ठिया आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनीं दिला आहे. दरम्यान, कामाच्या ठिकाणी अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच कंपनीकडून सुरक्षाफलक लावून देखावा निर्माण करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com