अमरावती : जिल्हा ग्रामीण नियंत्रण कक्षातील शंभर क्रमांकाचा दूरध्वनी कार्यालय अस्तित्वात आल्यापासून अद्यापपर्यंत ऍक्टिवेट करण्यात आलेला नाही. त्याचा मनस्ताप ग्रामीण नागरिकांसह शहर पोलिस नियंत्रणकक्षाला सोसावा लागत आहे. ग्रामीणांच्या या गैरसोयीकडे वरिष्ठांनी तब्बल 20 वर्षांपासून दुर्लक्ष चालविलेले आहे.
सर्वसामान्य नागरिकांना अत्यंत अटीतटीच्या वेळी पोलिसांची गरज भासते. अशा स्थितीत नागरिक शंभर क्रमांकावर फोन करतात. सद्यःस्थितीत शंभर क्रमांकाचा दूरध्वनी हा पोलिस आयुक्तालयाच्या नियंत्रणकक्षात आहे. ग्रामीण भागातून येणारे कॉल थेट शहर पोलिस नियंत्रण कक्षात येतात. त्याबाबतची माहिती घेऊन ती जिल्हा पोलिस नियंत्रण (ग्रामीण) कक्षाला दिली जाते. या माहितीची ग्रामीण नियंत्रण कक्षातर्फे नोंद घेऊन संबंधित ठाण्याला माहिती दिली जाते.
अचलपूर येथे निवडणुकीच्या तोंडावर तिहेरी खुनाच्या घटनेच्या वेळी ग्रामीण भागातून शंभर क्रमांकावर मोठ्या प्रमाणात कॉल करण्यात आले होते. एरवी शंभर क्रमांकावर कामाचे कमी आणि पोलिसांना मनस्ताप देणारे कॉल अधिक येतात. रात्री-अपरात्री येणारे कॉल तर थक्क करून सोडणारे असतात. परिणामी महत्त्वाचे कॉल रिसिव्ह करण्यात पोलिसांना अडचणी येतात. सद्यःस्थितीत शहर नियंत्रणकक्षात असलेल्या शंभर क्रमांकावर सेकंदाला एक कॉल येतो. कॉल रिसिव्ह केल्यास दुसऱ्या बाजूने कोणीच बोलत नाही.
जिल्हा पोलिस दलाचे 6 जुलै 1998 ला विभाजन होऊन शहर पोलिस आयुक्तालयाची स्थापना झाली. तेव्हापासून शंभर क्रमांकाचा दूरध्वनी हा शहर पोलिस नियंत्रणकक्षात आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाने शंभर क्रमांकाचा स्वतंत्र दूरध्वनी स्थलांतरित व ऍक्टिवेट करणे आवश्यक होते. मात्र तब्बल वीस वर्षांपासून ग्रामीण पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केलेले आहे. शहर पोलिसांनी यासंदर्भात बीएसएनएलकडे वारंवार पत्रव्यवहार केला, मात्र तेसुद्धा पोलिसांच्या पत्राला महत्त्व देत नसल्याची माहिती आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.