Yavatmal Lok Sabha: मेरिटच्या उमेदवाराला केलं नापास! का कापलं गेलं भावना गवळींचं तिकीट?

Yavatmal Lok Sabha Election 2024 Bhavna Gawli: भाजपच्या अंतर्गत सर्व्हेचं कारण शिंदेंच्या शिवसेनेला ठरतंय मारक
Bhavna Gawli
Bhavna Gawli

यवतमाळ- यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गेल्या पाच टर्म खासदार राहिलेल्या भावना गवळी यांचं तिकीट कापण्यात आलं. यामागे अँटिइन्कम्बन्सी, मतदारांची नाराजी आणि अतंर्गत सर्व्हेतून नागरिकांचा होणारा विरोध अशी अनेक कारण दिली जात असली तरी गवळींचं तिकीट कापण्यामागं षडयंत्र असल्याचा देखील सूर आहे. कारण भावना गवळी या सातत्यानं मेरिटचा उमेदवार राहिल्या असून या मेरिटच्या उमेदवाराला नापास करण्यात आलं आहे.

गवळीचं मेरिट नेमकं काय?

भावना गवळी या सन १९९९ पासून वाशीम-यवतमाळ मतदारसंघाच्या खासदार आहेत. सन २०१९ पर्यंत त्या कायम निवडून आल्या आहेत. पण यंदा मात्र राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली आणि त्यांचं तिकीट कापण्यात आलं. गेल्या २५ वर्षे त्या वाशिम-यवतमाळच्या खासदार राहिल्या आहेत.

शिवसेनेचा एक आक्रमक चेहरा म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांच्या पहिल्या निवडणुकीपासूनच या शेवटच्या २०१९ च्या निवडणूकीपर्यंत त्यांच्या मतदानात सातत्यानं वाढ झालेली दिसून येते. त्यांच्या मतांमध्ये झालेली ही वाढ साधारण दहा टक्के इतकी आहे.

Bhavna Gawli
Lok Sabha 2024 : शरद पवारांकडून महायुतीला तोडीस तोड उत्तर; पहिल्या टप्प्यातील राजकीय फेरजोडणीला आले यश

म्हणजेच भावना गवळींना सन १९९९ मध्ये पूर्वीच्या २०- वाशिम लोकसभा मतदारसंघातून २,४४,८२० इतकी मतं पडली होती. त्यानंतर २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत ३,५८,६८२ इतकी मत मिळाली. त्यानंतर पुढे २००९ मध्ये या मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्यानंतर तो १४ - यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ झाला.

पुनर्रचनेनंतरच्या या निवडणुकीत त्यांच्या मताचा आकडा ३,८४,४४३ इथपर्यंत पोहोचला. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत ४,७७,९०५ इतकी मतं आणि पुढे २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी ५,४२,०९८ इतकी विक्रमी मतं घेतली होती.

भावना गवळींची मतांची ही आकडेवारी पाहिली तर सातत्यानं त्यांच्या मतांच्या आकडेवारीत वाढ होत गेली आहे. त्यामुळंच त्या खरंतर मेरिटच्या उमेदवार आहेत. पण तरीही यंदाच्या निवडणुकीत त्यांना तिकीट नाकारुन नापास करण्यात आलं.

संसदेत उपस्थित केलेला ‘तो’ प्रश्न ठरला अडचणीचा?

यवतमाळमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. यासाठी अमृत योजनेद्वारे यवतमाळपर्यंत पाणी आणलं जाणार होतं. यासाठी ३२० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. पण या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असून हे मोठे पाईप अनेकदा फुटल्यानं त्यातून लाखो लिटर पाणी वायाला गेलेलं आहे. निकृष्ट दर्जाचे पाईप या योजनेत वापरल्यानं खरंतर ही परिस्थिती उद्धवली आहे.

हाच प्रश्न भावना गवळी यांनी लोकसभेत मांडला होता. यावेळी त्यांनी या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. तसेच या प्रकरणी संपूर्ण चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली होती. पण केंद्र सरकारला अडचणीत आणणारा हा प्रश्न विचारल्यानंही त्या टार्गेट ठरल्याची स्थानिकांमध्ये चर्चा आहे.

Bhavna Gawli
Maval Lok Sabha: वंचित मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार, स्‍थानिकांना मिळणार प्राधान्य

भाजपच्या अंतर्गत सर्व्हेचा मुद्दा ठरला फोल?

यंदाच्या निवडणुकीला महायुतीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन प्रमुख पक्ष सामोरे जात आहेत. त्यामुळं जागांचा तिढा सोडवणं खरंतर या तिन्ही पक्षांना जिकरिचं झालेलं आहे. पण यामध्ये शिंदेंच्या शिवसेनाला बॅकफुटवर जावं लागलं आहे. कारण यंदा शिवसेनेच्या अनेक विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्यात आलं आहे.

यासाठी भाजपनं केलेल्या अंतर्गत सर्व्हेक्षणातून उमेदवारांविरोधात नाराजी असल्याचं सांगितलं जात आहे. पण प्रत्यक्षात ग्राऊंडवर आता वेगळी परिस्थिती दिसून येत आहे. भावना गवळींऐवजी दिलेल्या उमेदवाराविरोधात लोकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळं खरंतर भावना गवळींचं तिकीट कापण्यामध्ये नेमका कोणाचा हात आहे का? अशी शंका उपस्थित राहते. (Lok Sabha Election News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com