कळंब (जि. यवतमाळ) - तालुक्यातील तिरझडा येथील तरुणाचे अपहरण करून कारमध्येच आठ जणांनी गळा आवळून खून केला. या प्रकरणाचा यवतमाळ पोलिसांनी ४८ तासांत छडा लावत मारेकऱ्यांना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश श्यामराव पवार (वय ४८, रा. तिरझडा) असे मृताचे नाव आहे. सोमवारी (ता. १५) शालिनी सुरेश पवार (वय २५) या महिलेने कळंब पोलिस ठाण्यात पतीच्या अपहरणाची तक्रार दिली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून एलसीबीचे पथक कामी लागले. दरम्यान, बुधवारी (ता. १७) सुरेश पवार यांचा मृतदेह वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वर्धा नदीपात्रात आढळून आला.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली असता, नात्यातील एका व्यक्तीने जुन्या वादातून सुरेश पवार यांचा पांढरकवडा येथील सात साथीदारांच्या मदतीने अपहरणाचा कट रचल्याचे समोर आले. आठ जणांनी सुरेश यांचे घरातून अपहरण केले. गाडीतच त्यांच्या तोंडाला दुपट्ट्याने बांधले व गळा आवळून खून केला. मृतदेह पुलावरून नदीपात्रात फेकून दिला.
नातेवाइकाने पोलिसांपुढे खुनाची कबुली दिली. त्यावरून एलसीबी, कळंब, पांढरकवडा पोलिसांच्या मदतीने सात आरोपींना गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह ताब्यात घेण्यात आले. पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, एसडीपीओ आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक प्रदीपसिंह परदेशी, पीआय अजित राठोड, पीआय जगदीश मंडलवार, सपोनि विवेक देशमुख, पीएसआय नीलेश गायकवाड, बंडू डांगे, बबलू चव्हाण, उल्हास कुरकुटे, नीलेश राठोड, सलमान शेख, किशोर झेंडेकर, प्रफुल्ल दळवी आदींनी ही कारवाई केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.