अकलूज : संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात आले. त्यानंतर पालखी सोहळ्याने आज सोलापूर जिल्हात प्रवेश केला. माने विद्यालयाच्या रिंगणात रंगलेला सोहळा दुपारी साडेबारा वाजता मुक्कामी विसावला आहे. अखंड प्रेमभक्तीत अकलूजकरांच्या पाहुणचारात वैष्णव सुखावले.
प्रेम अमृताची धार ।
वाहे देवा ही समोर ॥ १ ॥
उर्ध्ववाहिनी हरिकथा ।
मुगुटमणि सकळां तीर्थां ॥
आज अकलूजकरांची अशी भावना असते. श्री तुकोबारायांच्या सोहळ्याचे व अकलूजकरांची नात्याची गुंफण आहे. सोहळ्यातील स्वाराच्या अश्व हा मोहिते-पाटील घराण्याचा आहे. तसेच आज त्यांच्या नगरीत सोहळा असल्याने मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत झाले. मोठ्या प्रमाणात अन्नदान व विविध उपक्रम येथे राबविले जातात.
इंदापूर तालुक्यातील सराटी येथे ग्रामस्थांच्या वतीने अभिषेक केला. पंचपदीचे अभंग झाले. त्यानंतर वंशजांनी श्रीतुकोबारायांच्या पादुकांना सूर्योदयाच्या वेळी नीरा नदीमध्ये स्नान घातले. नदीच्या तीरावरील भाविकांनी ‘बोला पुंडलिक वरदे...’चा जयघोष केला. पुणे जिल्ह्याच्या वतीने अतिरिक्त मुख्य कार्यकारी भारत शेंडगे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार श्रीकांत पाटील, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, अप्पासाहेब जगदाळे यांच्यासह भाविकांनी या सोहळ्याला निरोप दिला. तर सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांनी सोहळ्याचे स्वागत केले.
माने विद्यालयाच्या मैदानावर सव्वा दहा वाजता नगारखाना व अश्व आले. रथापुढील दिंड्या आत आल्या. साडेदहा वाजता अब्दागिरी, गरुडटक्के व संभाजी महाराज छत्रपती यांनी दिलेला जरीपटका ध्वज, रिंगणात पोचला. अकराच्या सुमारास पालखी रिंगणात पोचली. त्यामागील दिंड्या सोहळ्यात आल्या. मोहिते-पाटील यांच्या अश्वांचे पूजन धवलसिंह यांनी केले.
अकरानंतर पताकाधारी वारकऱ्यांनी दोन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्यानंतर दहा मिनिटांनी तुळस हांडेकरी महिलांनीदेखील एक प्रदक्षिणा केली. साडेअकरा वाजता पखवाज वादक टाळकरी एक प्रदक्षिणा पूर्ण केली. साडेअकरा वाजता देवाच्या बाभूळगावकरांच्या अश्वांचे पूजन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व पत्नी उर्वशीराजे व जयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाले.
पावणे बारा वाजता अश्वांचे रिंगण सुरू झाले. अश्वांनी डौलदार दौड करीत चार फेऱ्या पूर्ण करीत डोळ्यांचे पारणे फेडले. ‘भाग्याचा उदय । ते हे जोडी संतपाय ॥’ हा मानाचा अभंग बारा वाजता झाला त्यानंतर आरती झाली. त्यानंतर पालखी उचलून दर्शन मांडवात ठेवली. ‘हे माझी मिराशी । ठाव तुझ्या पायांपाशीं ॥’ हा विसाव्याचा अभंग झाला. नंतर समाज आरती झाली. पुढील सूचना देऊन सोहळा मुक्कामी माने विद्यालयात विसावला.
आज उभे रिंगण
बुधवारी (ता. ६) सकाळी सात वाजता सोहळा बोरगावकडे मार्गस्थ होईल. बुधवारी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण माळीनगर येथे होणार आहे.
माउलींच्या पालखीत दोन वर्ष आणि आता तुकोबारायांच्या पालखीत पाच, अशी सात वर्षे माझी वारी पूर्ण झाली आहे. वारी आली की सगळे काम सोडून वारीत सहभागी व्हावे असे वाटते. वारी म्हणजे माझे माहेर. माहेरला जाताना जो आनंद होतो, तो आनंद वारीत मिळतो. वारीतून घेतलं तर शिकण्यासारखे खूप आहे.
- संगीता जाधव, रा. पिंपळगाव जि. नाशिक
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.