Ashadhi wari : विरहाच्या अतिउच्च भावनेची वारीतील गर्दीने प्रचिती

चैतन्य वारी : हभप नामदेव शास्त्री सानप, भगवानगड, नगर
Namdev Shastri Sanap
Namdev Shastri Sanap

भक्तिशास्त्र हे हृदयाचे शास्त्र आहे. इथे विचारांपेक्षा भावनेला अधिक महत्त्व असते. बुद्धिमान लोक जरी भावनेला मानत नसले तरी ते स्वतःच्या परिवाराबाबत भावनिक असतात. त्याप्रमाणे वारकरी संप्रदाय हा विठ्ठलाला मानणारा संप्रदाय आहे. तो विठ्ठलाशी एकनिष्ठ असतो. वारकरी आणि विठ्ठल हे अतूट नाते आहे. त्यामुळे कोरोना काळात दोन वर्षे पायी वारी करता न आल्याने विरहाच्या वेदना मनात आहेत. म्हणजे ज्याच्या त्या वेदना असतात, त्यालाच वारकरी म्हणतात. विरहाच्या वेदना आपल्या विरहिनीच्या अभंगातून संतांनी व्यक्त केल्या आहेत.

वारकरी संप्रदायात ज्ञानाला महत्त्व असेल; पण त्यापेक्षा अधिक महत्त्व भावनेला आहे. त्यातूनच भक्तामध्ये भक्तीची निर्मिती होते. संत तुकाराम महाराज यांना ताप आला होता. तेव्हा त्यांना आषाढी वारीला जाता आले नव्हते. त्या वेळी ते वारीला गेले नाहीत. त्या काळात तुकोबारायांनी विठ्ठलाबद्दल होत असलेले विरहाच्या अवस्थेचे ६६ अभंग पत्राद्वारे विठ्ठलाला पाठविले होते. त्या ६६ अभंगांचे नावच पत्रिका असे आहे. वारकरी संप्रदायात या ६६ विरहाच्या अभंगातील त्याचे दोन अभंग ४०० वर्षांपासून दुपारच्या भजनात म्हटले जातात. विरह नसला तरी ते परंपरेने म्हटले जातात.

तुकोबारायांच्या या विरहाच्या अभंगांचा खरा अर्थ प्रत्येक वारकऱ्याला कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात कळाला. त्याची भावनिक अनुभूती या काळात वारकऱ्यांनी घेतली. म्हणून भावनेशी जोडलेला वारकरी संप्रदाय आहे. व्यवहारामध्ये जशी बुद्धी काम करते, तशी भक्तिशास्त्रात हृदय सक्रिय असते. ते हृदय भावनात्मक असते. गेल्या दोन वर्षांत असलेल्या विरहाची वेदना प्रत्येक वारकऱ्यांत आहे.

यंदाच्या वारीतील संख्या पाहिली तर त्याच विरहाची वेदना उफाळून आल्याची प्रचिती येते. त्यामुळे विरह माणणारा, विरहाला महत्त्व देणारा भक्तिशास्त्रातील हा महत्त्वाचा संप्रदाय असून, व्यवहारात जरी तो ज्ञानाला महत्त्व देत असला तरी जगताना तो भावनाप्रधान असतो. वारकरी भक्तिशास्त्रयुक्त असल्याने तो विरहाने दोन वर्षे शरीराने नव्हे, तर हृदयाने वारी करीत होता. या वेळी वारी होत असल्याने सर्वांना शरीराने वारी करायला मिळते आहे, यात वारकऱ्यांना खूप आनंद आहे.

वारकरी संप्रदायातील प्रत्येक वारकऱ्याची काळजी पांडुरंगच घेत असतो. कोरोना नामक महामारीत तोच आपल्याला काळजी घ्यायला लावतो. कमी गर्दीत जाणे, स्वच्छता ठेवणे हे जे मानवी जीवनामध्ये ठेवलेले नियम आहेत, हे वारकऱ्यांनी पाळावेत आणि दुसरीकडे हृदयाने पांडुरंगाशी एकरूप राहावे, म्हणजे त्यातून दोन्ही गोष्ट्री साध्य होऊ शकतील. त्यातून वारकऱ्यांनाच परमानंदाची प्राप्ती होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com