विचार करा : अजून नाही गमवायचे...

Nirbhaya
Nirbhaya

हिंगणघाटच्या घटनेने समाजातील प्रत्येक घटक वेदनेने तडफडतोय, उद्विग्न होतोय आणि एकच प्रश्न मनामध्ये आणतोय, तिच्या न्यायाचे काय? काही तिला सबला म्हणतील, काही निर्भया म्हणतील, पण ती अमानुषतेची बळी ठरलेली निष्पाप पीडिताच होती. ती पहिल्यांदा बळी पडली, त्या नराधमाच्या हल्ल्यात आणि दुसऱ्यांदा पडेल कायद्याच्या कचाट्यात! 

होय... कारण न्याय मिळेल तो कधी, याचे उत्तर कोणीच देऊ शकत नाही, अगदी न्यायव्यवस्था चालवणारेही नाहीत, हे सत्य नाकारून कसे चालेल? किती बलात्कार आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये पीडितांना वेळेत न्याय मिळतोय? नव्वदमध्ये परीक्षा केंद्रात माथेफिरूने पेटवून दिलेले रिंकू पाटील प्रकरण असेच. दिल्लीच्या निर्भया प्रकरणाने देश संतापला, कोपर्डीच्या घटनेने तळपायाची आग मस्तकाला गेली. हैदराबाद घटनेने शब्दशः थरकाप उडाला. हैदराबादच्याबाबतीत जे झाले, त्यावर चर्चा होऊ शकते, वादविवाद होऊ शकतात; पण त्या एनकाउंटरमधून जनमानसाला मिळालेले ‘समाधान’, ‘न्याय’ संकल्पनेला न्याय मिळवून देऊन गेले. 

न्यायाचे काय?
एखादी महिला अत्याचाराची घटना घडल्यावर विषय येतो ‘फास्ट्रॅक कोर्टा’चा. चर्चा होतात, आश्‍वासने मिळतात आणि कालांतराने सगळे हवेत विरते. याचे ताजे आणि आपल्यासमोर असलेले जिवंत उदाहरण म्हणजे कोपर्डीची घटना. आत्तापर्यंत कोपर्डीच्या गुन्ह्यात आरोपींना शिक्षा होऊ शकली नाही, ही वस्तुस्थिती आहे. मग जलद न्यायाचे काय? आपली न्यायव्यवस्था आदर्श असेलही, पण वेळेत मिळाला नाही तर त्याला न्याय कसा म्हणायचा? कायदा शब्दशः ‘कडक’ असेल तरच अशा अत्याचारांना रोखण्याचा उत्तम आणि अखेरचा पर्याय दिसतो. महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये होणाऱ्या शिक्षा आरोपीला पीडितेइतक्‍या यातना देणाऱ्या नाहीत, याची जाण असल्याने तर आरोपी निर्ढावत नसतील ना? महिला अत्याचाराच्या बाबतीत पुरुषाच्या मानसिकतेवरही अनेक अंगांनी चर्चा होतायत. परंतु ती मानसिकता बदलत नाही. पुरुषप्रधान मानसिकता बदलणे सोपे नक्की नाही. कारण, आपल्या समाजाची चौकट पुरुषप्रधान मानसिकतेवर आधारित आहे. 

मुलांची जडणघडण महत्त्वाची
बदलाला खरी सुरुवात मुलांच्या जडणघडणीत लक्ष देण्यातून तर आहेच; कारण ती वयात आलेल्या मुलांची मानसिकता तयार करते. मुलांवर घरामध्ये स्त्री आदराचे संस्कारही केले जातात किंवा होतीलही. पण अत्याचाराच्या घटनांमध्ये मूळ प्रश्न राहतो, तो स्त्रीने दिलेला नकार पुरुष पचवू शकत नाहीत. हा विद्वेष जाळणे, ॲसिड हल्ला करणे, भोसकणे या क्रूरतेपर्यंत घेऊन जातो. ‘माझी नाही तर कोणाचीच नाही’ ही भावना तयार व्हायला आसपासची परिस्थिती तर असतेच, शिवाय कायद्यातील पळवाट आणि न्यायाच्या प्रतीक्षेत असलेली प्रकरणे खतपाणी घालतात. 

शालेय जीवनातील लैंगिक शिक्षणाबाबतची उदासीनताही आपल्याला बाजूला सारावी लागेल. व्यापक आणि खुल्या मनाने संवाद ठेवावा लागेल. कायद्याची भीती आणि पुरुषी मानसिकतेत आमूलाग्र बदल करूनच अशा घटनांना जरब बसवता येईल. आता अजून कोणतीच लेक आम्हाला गमवायची नाही, ही भावना निर्माण करावी लागेल...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com