‘पॉवर’ पॉइंट : आयुष्याची ‘क्रम’वारी

खूप जवळचे वाटतील असे मित्र-मैत्रिणी असणं, मग कालांतरानं थोडके मित्र-मैत्रिणी असणं, काही वर्षांनी एखादीच मैत्रीण आणि एखादाच मित्र असणं, ज्याबरोबर किंवा जिच्याबरोबर अगदी काहीही बोलावंसं वाटेल; असा प्रवास माझा झालाय.
Life Sequence
Life SequenceSakal

खूप जवळचे वाटतील असे मित्र-मैत्रिणी असणं, मग कालांतरानं थोडके मित्र-मैत्रिणी असणं, काही वर्षांनी एखादीच मैत्रीण आणि एखादाच मित्र असणं, ज्याबरोबर किंवा जिच्याबरोबर अगदी काहीही बोलावंसं वाटेल; असा प्रवास माझा झालाय. म्हणजे माझ्यातला माणूसघाणेपणा वाढलाय, असा एक समज होईल. किंवा मी फार स्वार्थी, निवडक, आत्मकेंद्री झालीये असाही समज होऊ शकतो. आता समज करूनच घ्यायचा म्हटला तर तो काहीही होऊ शकेल.

मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येक जण या पायऱ्यांवरून जातो. खूप खूप भारी मैत्र वयानुसार, अनुभवांनुसार बदलत जातं. एकतर आपण शहाणे होतो, किंवा आडमुठे. आपण स्वत:ला कुठल्या बाजूला बघतोय त्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक विशेषण लावतो.

पण आयुष्यातली सगळी डिसकनेक्शन्स नकारात्मक अर्थानं बघण्याची काय गरज आहे? काही व्यक्ती आयुष्यातून गेल्यामुळे अनेकदा आत्मिक शांतताही लाभते. अनेक नाती अशी असतात जी सामाजिक दडपणात आपण स्वीकारलेली असतात. काही नाती अशी असतात, जी नसल्यावर हुरहूर वाटेल या भीतीनं गाठ निसटत असली, तरी सोडण्याची तयारी नसते.

माझ्या ओळखीची एक व्यक्ती आहे. ती व्यक्ती अतिशयच भोळी आहे. या भोळ्या स्वभावामुळेच त्या व्यक्तीला घरातल्यांपासून बाहेरच्यांपर्यंत खूप जणांनी आयुष्यभर प्रचंड गृहित धरलं. इतकं गृहित धरलं, की ती व्यक्ती स्वत:ला हरवून बसली. आयुष्यातले छोटे छोटे निर्णही स्वत:चे स्वत: घेणं त्या व्यक्तीला झेपेना. मी कधी हे दाखवण्याचा प्रयत्न केला, तर ‘तुझ्या भोळेपणाचा हा परिणाम आहे,’ हे तरी त्या व्यक्तीला कसं सांगणार? हळूहळू घटनाच अशा घडत गेल्या, की सतत गृहित धरून वाट्टेल तशी वागणूक देणाऱ्या अगदी जवळच्या माणसांचाही त्या व्यक्तीला उबग आला. ‘निम्मं आयुष्य सरलं आणि माझ्या हातात माझं असं काहीच नाही राहिलं,’ ही जाणीव खायला लागली. मग अचानक त्या व्यक्तीच्या आयुष्यातून अक्षरश: अर्धा डझन नाती गायब झाली.

आज ती व्यक्ती माझ्याशी बोलताना खूप शांत, फ्रेश जाणवते. काही डिसकनेक्शन्स आयुष्याला चांगला अर्थही देऊन जातात ते असं. गंमत म्हणजे त्या व्यक्तीनं आयुष्यातून काढून टाकलेली नाती परत परत डोकावत असतात, ती व्यक्ती अजूनही तेवढीच भोळी आहे का हे बघायला. पण यावेळी शहाणपण जिंकतं.

ज्या नात्यांनी आपल्याला पुढे जायला प्रेरणा मिळत नाही. ज्या व्यक्तींच्या शेजारी शांत बसल्यावरही एक अस्वस्थता ऐकू येते, अशा माणसांना आपल्या आयुष्यात ठेवून चांगुलपणाचे पुरस्कार मिळवण्याला काही अर्थ नाही. घरातल्या वडिलधाऱ्यांची शिकवण आहे ‘एक घाव दोन तुकडे’ असं नात्यांमध्ये करू नयेत. ते जरा समजून, सावरून घ्यावं. पण ते किती? आणि का? याची उत्तरं कधी मिळतच नाहीत.

मुद्दा असाय, सगळ्यांच्या नजरेत छान असणाऱ्या व्यक्तींनी स्वत:च्या तत्त्वांचा, मूल्यांचा, भूमिकेचा, भावनांचा खूप त्याग केल्याची शक्यताच अधिक असते. त्यामुळे ‘सगळ्यांशी छान असावं’ हा अट्टाहास सोडला पाहिजे. एकदा हा अट्टाहास सोडला, की स्वार्थी, आडमुठी, आत्मकेंद्री अशी कोणतीही विशेषणं चिकटू शकतात, ज्याच्याकडे लक्ष द्यायची अजिबात गरज नाही. काही माणसं आयुष्यातून वजा करून शांतता मिळत असेल, तर आयुष्यातला हा उतरता क्रम नसतो. तर चढता क्रम असतो हे नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com