दिलखुलास : चूक, मतभेद आणि संवाद

मनुष्य स्वभाव असा आहे, ना की एखादी गोष्ट जर मला पटत नसेल, तर ती चूकच आहे, असंच माझं ठाम मत असतं; पण समोरच्या व्यक्तीच्या मतानुसार त्यालाही त्याचंच म्हणणं बरोबर वाटत असतं.
दिलखुलास : चूक, मतभेद आणि संवाद
Summary

मनुष्य स्वभाव असा आहे, ना की एखादी गोष्ट जर मला पटत नसेल, तर ती चूकच आहे, असंच माझं ठाम मत असतं; पण समोरच्या व्यक्तीच्या मतानुसार त्यालाही त्याचंच म्हणणं बरोबर वाटत असतं.

- कांचन अधिकारी

समोरच्या व्यक्तीच्या मतांचा आदर राखून आपण आपली मतं त्याच्या गळी न उतरवतासुद्धा आपण दोघं दोस्त म्हणून जगू शकतो. ज्याच्यात आपलंही मन शुद्ध व साफ राहतं.

मनुष्य स्वभाव असा आहे, ना की एखादी गोष्ट जर मला पटत नसेल, तर ती चूकच आहे, असंच माझं ठाम मत असतं; पण समोरच्या व्यक्तीच्या मतानुसार त्यालाही त्याचंच म्हणणं बरोबर वाटत असतं. अशा वेळेला काय घडतं? तर प्रथम- प्रथम या दोन व्यक्तींमध्ये त्या विषयाला धरून चर्चा सुरू होते. मग आपलंच म्हणणं कसं बरोबर आहे? हे तात्त्विक सिद्धांतांचा आधार घेऊन एक दुसऱ्याला पटवण्याचा प्रयत्न करायला लागतो. ज्याच्यातून कधीकधी संघर्षही पेटायला लागतो आणि याच संघर्षाच्या ठिणगीतून भांडणंही होतात. ज्याचं रूपांतर शेवटी त्या दोन व्यक्तींमध्ये अबोला निर्माण होण्यात होतं.

आपण या एका गोष्टीकडे जर एक त्रयस्थ म्हणून पाहिलं, तर आपल्याला असं वाटतं, की ती व्यक्ती आणि तिची मतं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. केवळ या एका मतासाठी तुम्ही त्या व्यक्तीलाच बाजूला करणं हे काही बरोबर नाही; पण प्रत्यक्षात मात्र वेगळंच चित्र दिसतं ते म्हणजे त्या दोन्ही हुषार व्यक्ती आपापल्या मतमतांतरांना इतकं महत्त्व देतात, की ते भांडण त्यांच्या मनात अगदी हृदयात खोल कुठेतरी दडून बसलेलं असतं आणि म्हणूनच कधीतरी जेव्हा आपल्याला त्या दुसऱ्या व्यक्तीशी बोलावंसं वाटतं, तेव्हा आपल्या मनात प्रथम हाच विचार येतो, की ‘मीच कशाला पहिल्यांदा गेलं पाहिजे, जाऊदेत ना!’ पण अगदी त्याच्याच उलट आपण जर Forget and Forgive असा विचार केला आणि त्या न्यायाने वागलो, तर त्या दोन्ही व्यक्ती पुन्हा परत तितक्याच आनंदाने हसतखेळत जगू शकतात.

समोरच्या व्यक्तीच्या मतांचा आदर राखून आपण आपली मतं त्याच्या गळी न उतरवतासुद्धा आपण दोघं दोस्त म्हणून जगू शकतो. ज्याच्यात आपलंही मन शुद्ध व साफ राहतं आणि समोरची व्यक्तीही विचार करायला लागते, की ‘खरंच याचं मन किती मोठं आहे. हा पूर्वीचं सगळं विसरून खुल्या दिलानं दोस्ती निभावतो आहे.’

खरंतर हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे, की आपण समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याला किती प्रतिसाद द्यायचा. आपण त्याच्या बोलण्यावरून स्वतःला घायाळ करून घ्यायचं, की अधिक हुषार बनवायचं. म्हणूनच संतांची वचनं सांगतात ना, की आपल्याला कुणीही दुखवू शकत नाही. आपणच स्वतःच आपल्याला दुखवून घेतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com