घरकुल अपुले : उन्हाळ्यातली ‘रस’यात्रा

मंडळी, तसं म्हणाल तर ऋतुमानानुसार असा आहार खूप कमी झालाय. हो, तसं आपल्यासारखी खवय्यी माणसं खाण्यावर प्रेम करतात.
Mango Juice
Mango JuiceSakal
Summary

मंडळी, तसं म्हणाल तर ऋतुमानानुसार असा आहार खूप कमी झालाय. हो, तसं आपल्यासारखी खवय्यी माणसं खाण्यावर प्रेम करतात.

- मीनल ठिपसे

मंडळी, तसं म्हणाल तर ऋतुमानानुसार असा आहार खूप कमी झालाय. हो, तसं आपल्यासारखी खवय्यी माणसं खाण्यावर प्रेम करतात; पण ऋतुमानानुसार जसं पावसाळ्यात गरमागरम खेकडा भजी, आल्याचा फक्कड चहा, भाजलेलं कणीस, सिंहगडावरचं पिठलं-भाकरी (जगात भारी पिठलं-भाकरी आणि भजीबरोबरचा तिखट तेल कांदा यासारखं सुख दुसरीकडे कुठे नाहीच हे अधोरेखित!) थंडीत वाफाळलेलं सूप, डिंकाचे लाडू, अळीवाची खीर, गरमागरम कांद्याची आमटी, भात, पापड ...आणि कैक नावं घेता येतील. आणि अजूनही हे पदार्थ होतातच आणि वेळीअवेळीही अनेक पदार्थ घरात आणि बाहेर खाल्ले जातात. हल्ली सोय बघितली जाते; पण मला मात्र दोन्हीकडच्या आजींची आठवण होते. किती शिस्तीत करणं... अर्थात माणसंही खूप असायची, त्यामुळे पापड, लोणची घालणं, वाळवण वगैरे वर्षाचं सगळं उन्हाळ्यात झालेलं असायचं... रोज सकाळी पोळी आणि फळभाजी आणि लागेल तशी रात्री भाकरी. एखादी दही सरसरीत करून केलेली कोशिंबीर आणि थंडीच्या दिवसात हमखास पालेभाजी.

उन्हाळ्यात मात्र घारीचं लक्ष असायचं यांचं!... कारण सारखं ते नवीन आणलेल्या फ्रीजचं पाणी आणि टीव्हीवरच्या जाहिरातीत अमृत वाटताहेत अशा झोकात रसनाची येणारी ॲड पाहून सतत ते कसं आणता व करता येतील याचे आम्हा पोरांच्या मनात चालणारे प्लॅन्स (आम्हा मुलांना त्या ॲडमधल्या आईचं जाम कौतुक वाटायचं. मस्त रंगीबेरंगी रंगाचं रसना स्वतः करून आपलं मुलं आणि त्यांचे सवंगडी यांच्यासाठी खास आणून द्यायची. आम्ही पार टाहो फोडला तरी गाडीवरची कुल्फी आणि ते रसना आमच्या मोठ्यांना आम्हाला घ्यायचाच नसायचं.) मग प्रवचन ऐकायला मिळायचं; पण खास उन्हाळ्यासाठीच्या गोष्टी खायला प्यायला आणि शिकायला मिळायच्या...

जिरे वाटून लावलेलं ताक, वाळा घालून ठेवलेलं माठातील पाणी, लिंबू सरबत, कोकम सरबत, कैरीचं गोड तिखट लोणचं, कैरी वाफवून आणि कच्च्या कैरीचं पन्हं, आंबे, नाचणीचं आटवल...

आता त्यात थोडा फार बदल करून मी पण पुदिन्याची कांजी, सब्जा बी घालून सरबत, कलिंगडाचं सॅलड, पीयूष, लस्सी... असं ॲड करत असते; पण एकूणच काय उन्हाळा आलाय! आता खास ‘खत्री’कडची मावा कुल्फी, ‘आनंद ज्यूस बार’कडचा ज्यूस, ‘मानसी गोळा’, एकत्र मिळून केलेलं पॉट आईस्क्रीम वगैरेंबरोबर ही पेयं पण नक्की होणार.

पण अजून खास म्हणजे चैत्रगौरी आली, की कैरीची डाळ, ओल्या काजूबियांची उसळ, फणसाची भाजी, सांदण. सांदण म्हणजे ‘फणसाचा केक.’ रवा, नारळाचं दूध आणि फणसाचा गर यांपासून बनवलेला केक- ज्यावर तुपाची धार आणि रसनादेवी तृप्त!

पण सगळ्यात मोठा मान म्हणजे आंबे. याची शानच वेगळी. राजेशाही रूपडं आणि कमाल चव. नुसतं नाव उच्चारलं, तरी आंब्याचे कित्ती प्रकार डोळ्यांसमोर येतात. नुसते आंबे, आंब्याचा रस, खास मिल्कशेक, मस्तानी, कुल्फी. गरमागरम पुरी, ताजा आंब्याचा रस आणि बारीक फोडींचं कैरीचं लोणचं...निव्वळ स्वर्गसुख!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com