आपल्याला ‘कौतुकाची गरज’ का लागते वाचा सविस्तर..

आपल्याला ‘कौतुकाची गरज’ का लागते वाचा सविस्तर..

प्रेमाची आणि भावनांची भावनिक गरज आपल्यावर कसा प्रभाव पाडते, हे आपण शिकलो आहोत. आपण आता आपल्याला लहानपणापासूनच शिकवल्या जाणाऱ्या व नंतर सवय बनलेल्या ‘कौतुकाची गरज’ याबद्दल बोलणार आहोत. आता आपण आपल्या बालपणात परत जाऊ या. आपण एखादी नवीन कृती केल्यावर, अभ्यासात प्रगती दाखवल्यावर आपले कौतुक होते. ते आपल्याला आवडायला देखील लागते. थोडक्यात, आपण काही छान केल्यावर कौतुक होते. हेच कौतुक आपल्याला अधिक परिश्रमाची प्रेरणा देते. 

त्यानंतर आपले पालक, नातेवाईक, महाविद्यालयीन मित्र, सहकर्मी, वरिष्ठ यांच्याकडून नकळत कौतुकाची अपेक्षा होत जाते. परिणामी, तेथे एक साधे समीकरण तयार होते. माझे ‘कौतुक’ झाल्यास मला स्वतःबद्दल चांगले वाटते. आपले कौतुक झाले नाही, तर काय होते? तिथेच संघर्ष सुरू होतो.आपण लहानपणापासूनच कौतुक व आत्मविश्‍वास यांना जोडतो. काही लोकांना कौतुक न झाल्यास राग येतो, कधी कधी स्वतःवरचा विश्‍वासही जातो. कधी कधी असेही होते की, आपण सतत कठोर परिश्रम घेतो; ते केवळ विशिष्ट व्यक्तीकडूनच प्रशंसा मिळविण्याच्या अपेक्षेने. कारण आपण त्यांना महत्त्व देत असतो आणि त्यांच्याकडूनच प्रमाणपत्र मिळावे, ही अपेक्षा असते. 

एक आई होती, आपल्या मुलांसाठी जे काही केले त्याबद्दल ती सतत मुलांकडून कौतुकाची अपेक्षा करायची. अप्रत्यक्षपणे, मुलांनी तिचे कौतुकही केले. आईकडून कौतुकाचे प्रमाणपत्र मिळविणे हेच मुलांचेही उद्दिष्ट होते. दुर्दैवाने, आईने कधीही तिच्या मुलांचे बिनशर्त कौतुक केले नाही. परिणामी, मुले आसपासच्या इतर लोकांकडून सतत कौतुकांची अपेक्षा करू लागली. त्याच वेळी, त्यांच्या आईकडून नकळतपणे आजूबाजूच्या कोणत्याही गोष्टीचे कौतुक केले नाही. अशा वेळी ते स्वतःवर व दुसऱ्यांवरही विश्‍वास ठेऊ शकले नाहीत. 

या कथेचे सार असे आहे की, आपण नकळतपणे काही लोकांना अधिक अधिकार देतो व त्यांच्या कौतुकाची वाट पाहत राहतो. परिणामी आत्मविश्‍वासाचा अभाव निर्माण होतो व आपण स्वतःचे व इतरांचे कौतुक करू शकत नाही. त्यातूनच ईर्षा, राग व तुलना करणे याचा जन्म होतो. आता या कौतुकाच्या गरजेवर कार्य करण्याची आणि निराकरण शोधण्याची वेळ आली आहे. 

१) आपण सतत इतरांकडून कौतुक शोधत आहात का? हे तपासा ः
आपण सतत कौतुकांची अपेक्षा करीत आहात का, हे तपासणे आवश्यक आहे. जर होय, तर ते स्विकारुया. त्यात काहीही चूक नाही. 

२) आपल्याला अपेक्षित कौतुक नाही मिळाले तर आपण काय करतो? 
विशिष्ट लोकांकडून आपल्याला अपेक्षित कौतुक न मिळाल्यास आत्मनिरीक्षण करा. आपण सतत इतरांकडून कौतुकांची अपेक्षा ठेवतो का? त्यातून स्वतःला कमी लेखतो का? 

३) ‘का?’ हा प्रश्‍न विचारा 
स्वतःला विचारा, ‘मी या ‘कौतुकांची’ अपेक्षा का करीत आहे?’ ‘फक्त या व्यक्तीकडूनच का?’ या प्रश्‍नांची उत्तरे आपल्याला मूळ कारण ओळखण्यात मदत करतील. 

४) स्वतःला विचारा, ‘मी स्वतःचे पुरेसे कौतुक करतो/करते का?’ 

हे या समस्येचे मूळ समाधान आहे. आपण स्वतःचे पुरेसे कौतुक न केल्यास, दोन गोष्टी घडतील 
१) आपण इतरांकडून कौतुकांची अपेक्षा करत राहू. 
२) आपण इतरांचे कौतुक करणार नाही. लक्षात ठेवा! कौतुकाची अपेक्षा ठेवण्यात काहीच चूक नाही, मात्र सतत कौतुकाची अपेक्षा करणे हानिकारक आहे. अपेक्षित कौतुक न मिळाल्यास त्याचा आपल्यावर कसा प्रभाव पडतो, हे समजून घेण्यातच तुमचा विजय आहे. 

मैत्रीण 

पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com