वर्णपद्धती आणि जातीव्यवस्थेनंतर स्त्रियांची अधोगती सुरू झाली ; भालचंद्र नेमाडे

वर्णपद्धती आणि जातीव्यवस्थेनंतर स्त्रियांची अधोगती सुरू झाली ; भालचंद्र नेमाडे

मुंबई, ता. देशामध्ये स्त्रियांनी शेती, पशुपालन आदींचा शोध लावला. परंतु वर्णपद्धती आणि जातीव्यवस्थेनंतर स्त्रियांची अधोगती सुरू झाली. स्त्रियांचे फार मोठे नुकसान झाले स्त्रियांना काहीही अधिकार न ठेवणे असे प्रकार सुरू झाले. त्यामुळे आता हे सगळे चित्र बदलले पाहिजे, असे मत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते व ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी आज मुंबईत व्यक्त केले.

शिवार चॅरिटेबल ट्रस्ट, माथला, ता. जिंतूर, जि. परभणी यांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या 'रुपाली दुधगांवकर राष्ट्रीय साहित्य पुरस्कार' हा पुरस्कार ज्येष्ठ लेखिका, चित्रकार आणि महाराष्ट्राचे साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील यांना आज मुंबईत पु. ल. देशपांडे अकादमी, रविंद्र नाट्यमंदिर येथील मिनी थिएटर, येथे नेमाडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

पॉप्युलर प्रकाशनाचे प्रकाशक, रामदास भटकळ माजी खासदार अड. गणेशरावजी दुधगांवकर, परभणीच्या ज्ञानोपासक शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ. संध्याताई दुधगांवकर, इंजि. समीर दुधगांवकर, प्रोफेसर डॉ. श्रीधर भोंबे प्रोफेसर, डॉ. विलास पाटील आणि संपादक, लेखक संदीप काळे आदी उपस्थित होते.

नेमाडे पुढे म्हणाले, पूर्वी महिला शेती आणि कुटुंबे सांभाळत होत्या. त्यांनी अनेक राजसत्ताही विकसित केल्या होत्या. ही बाब प्राच्यविद्यापंडित शरद पाटील, डॉ. आ. ह. साळुंखे आदींनी नीटपणे मांडलेले असल्याचे त्यांनी सांगितले

डॉ. मीनाक्षी पाटील यांनी काढलेले आपण पहिले चित्र पाहिले होते, तेव्हा त्यांची माहिती घेतली. पाटील यांच्या कवितेत स्त्रियांचा कोंडलेपणा जगण्यातील बाहेर-आत या भावना, संवेदनाची स्थिती त्यांना सापडली आहे, असेही नेमाडे म्हणाले. साहित्याच्या क्षेत्रात नेहमीच सारखे लिहिण्यापेक्षा वेगळे काहीतरी लिहा असे आपल्या नेणीवा आपल्या नेहमी सांगतात. जाणिवांच्या माध्यमातून आपण कवितेतून खरे बोलत असतो. असेही ते म्हणाले. स्त्रियांनी स्वतंत्र विचाराची कृती समोर आणली पाहिजे असे आवाहनही यावेळी नेमाडे यांनी केले.

मराठवाड्यात 18 वर्षे राहताना आपल्याला आलेले अनुभव आणि त्यातून आपण जे काही शिकलो त्याबद्दल त्यांनी मराठवाड्याचे ऋण हे व्यक्त केले. सुरुवातीला काहीतरी करता येईल, या उद्देशाने काही लोक एकत्र आलो होतो. पण पुढे ते सगळी आपापल्या क्षेत्रात गेली मी मात्र कचाट्यात सापडलो आणि त्यानंतर मराठवाडा सोडून दिला. तेव्हापासून मी धडा शिकलो. की समाज सुधारण्याच्या भानगडीत पडायचे नाही. असे सांगत त्याने यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्रात आजची जी परिस्थिती होईल, असे कोणाला तरी वाटले होते का असा सवाल करत मी मराठवाड्यानंतर मात्र सुधारणाच्या भानगडीत पडलो नाही अशी कबुली त्यांनी यावेळी दिली.

प्रमुख पाहुणे व पाप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ म्हणाले, पुरस्काराचे महत्त्व हे रकमेवर नाही तर ज्या प्रक्रियेतून आणि कोणाला दिले जाते, यावरून त्याचे महत्व वाढते. माझ्या प्रकाशन कार्याला ७० वर्षे झाली. पुस्तक निवडताना आम्ही चोखंदळपणे निवडली असल्याचे ते म्हणाले. भटकळ यांनी मीनाक्षी पाटील यांच्या दोन कविता वाचून दाखवल्या.

डॉ. मीनाक्षी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना हा पुरस्कार मातृशक्ती, त्यातील मातृत्व यांचा हा सत्कार आहे. असल्याचे सांगत आपल्या कविता या कल्लेश्वरी यांना अर्पण केल्याचे सांगितले.

यावेळी संपादक, लेखक संदीप काळे म्हणाले,शिवार चॅरिटेबल ट्रस्टने मराठवाड्यात लेखकांची चळवळ उभी केली. पुरस्कारामुळे मागे भावना आहे, त्यातून चर्चा होत असतात. मीनाक्षी पाटील यांनी जे उभे केले, ते महिला, मुली, लेखक यांनी अंगीकारले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, माजी मंत्री गणेशरावजी दुधगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच पाटील यांना पुरस्काराची २१ हजार रुपयांची रोख रक्कम स्वीकारली नसल्याने ती जिंतूर येथील पत्रकारांच्या संघटना, प्रेस क्लब आणि जिंतूर पत्रकार संघाना विभागून देण्याची घोषणा शिवारचे अध्यक्ष डॉ. श्रीधर भोंबे यांनी केली आणि लगेच ती, विजय चोरडिया यांना ती देण्यात आली. तर यावेळी मीनाक्षी पाटील यांचे पुंडलिक राठोड यांनी काढलेले पोट्रेट यावेळी त्यांना देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com