पाणी हेच जीवन

जलं ददाति जीवनम् जलं विना मरणम्...अर्थात पाणी असेल तर जीवन व नसेल तर मरण...
Save water
Save water google

पाणी म्हणजे जल व जल म्हणजे जीवन. हे वाक्य अत्यंत समर्पक आहे .पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.पाणी अस्तित्वात असेल तर ही जीवसृष्टी अस्तित्वात राहणार आहे अन्यथा नाही;परंतु या जगात असे काही घटक अस्तित्वात आहेत की ज्यांच्यामुळे जलसंकट ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तो घटक म्हणजे...मनुष्य..हो मनुष्यच!

मनुष्याने वेळोवेळी हे सिद्ध करून दाखवलचं आहे.त्याची अशी धारणाच झाली आहे की या पृथ्वीचा कसाही वापर केला तरी तिला कुठे काय होणार आहे?मानवाने केवळ आपल्याच स्वार्थासाठी हे सर्व केलं आहे , आणि म्हणूनच 'नेमेचि येतो पावसाळा' असे म्हणण्याऐवजी ''नेमेचि येतो दुष्काळ' असे म्हणायची वेळ आली आहे.शेती म्हटलं की पाण्याचा वापर तर होणारच. पण पाण्याअभावी असे कितीतरी शेतकरी या महाराष्ट्रामध्ये आहेत की ज्यांनी पाण्याअभावी निर्माण झालेल्या समस्यांमुळे मृत्यूला कवटाळलं!आणि त्यामुळे कित्येकांची कुटुंबं निराधार झाली.व यासाठीच जर मानवाने पाण्याचा वापर योग्य पद्धतीने केला असता,त्याचे योग्य नियोजन केले असते तर कदाचित ही वेळ आलीच नसती.

पाणी हा विषय जरी कितीही चावून चोथा झालेला असला त्याबद्दलचं अज्ञान दिसून येतं.जसे की,आपण जितके जास्त पाणी अडविण्याचा प्रयत्न करु तितक्याच प्रमाणात ते जमिनीत मुरेल आणि म्हणूनच नदीनाले यांची खोली जितकी जास्त तितके उत्तम किंवा एका शेतात खोदलेल्या विहिरीला जास्त पाणी लागले म्हणून शेजारच्या शेतातील विहिरीलासुद्धा जास्त पाणी लागेल;परंतु आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, हे लक्षात न घेता पाणलोट क्षेत्रात करण्यात येणारी विविध कामे आणि समस्या समोर घेऊन येतात.व अशा चुकीच्या पद्धतींचा अवलंब केल्यामुळेच गावे व त्यांमधील समस्या वाढत राहतात.आणि म्हणूनच अशा एका गावाकडून प्रेरणा घेणे गरजेचे आहे की ज्याने अशा परिस्थितीवर मात केली!आता तुम्ही म्हणाल की असे गाव अस्तित्वात आहे?आणि जरी असेल तर कोणते?

चला तर पाहुया:

कडवंची (जालना):

मराठवाडा. महाराष्ट्रातील ८ जिल्हे मराठवाड्यात समाविष्ट होतात. व या ८ जिल्ह्यांपैकीच एक जिल्हा म्हणजे जालना.आणि या जिल्ह्यातीलच एक गाव व ते म्हणजे कडवंची. इतर गावांप्रमाणेच असलेलं असं हे गाव. या गावात १९९५ सालापर्यंत स्त्रियांना पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागायची.ओसाड रान आणि पाण्याची फारशी चांगली परिस्थिती नसलेलं असं हे गाव.पण आज...आज या गावातील एक नव्हे दहा नव्हे तब्बल ७५०-८०० शेतकरी आहेत की ज्यांच्याकडे शेतीसाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे.आणि हे सर्व शक्य झालं ते कशामुळे?हे शक्य झालं ते या गावातील लोकांनी अवलंब केलेल्या शेततळयांमुळे!आज या गावात ४०० हून अधिक शेततळे अस्तित्वात आहेत. व आज या गावात शेततळे आणि भूजल यांच्या वापरामुळे वर्षभर पाण्याची कमतरता जाणवत नाही.काही वर्षांपूर्वी याच गावातील लोक कामासाठी स्थलांतर करत होते,पण आज परिस्थिती अशी आहे,की शेकडो लोक संपूर्ण भारतातून याठिकाणी येतात.

  • शेततळे ठरली वरदान-

१.क्षेत्रफळ - ८१० हेक्टर

२.लोकसंख्या - ५०००

३.शेततळयांची संख्या - ५६४

४.द्राक्ष उत्पादनात अग्रेसर (२५००० एकरपेक्षा अधिक क्षेत्रात द्राक्षाचे उत्पादन)

५.आज या गावात तुतीच्या झाडाचीदेखील लागवड केली जाते तसेच, अनेक भाज्यांचीसुद्धा लागवड केली जाते.

६.या गावातील शेतकऱ्यांना त्यांचा माल बाहेर घेऊन जाण्याची गरज पडत नाही याउलट व्यापारी स्वतःहून येतात माल विकत घेण्यासाठी.

Rain water harvesting
Rain water harvestinggoogle
  • अशक्य ते सहजशक्य-

१.२००० सालापर्यंत या गावाचे एकूण उत्पन्न होते ७७ लाख रुपये.पण, आज या गावाचे एकूण उत्पन्न आहे तब्बल ७५ कोटी रुपयांहून अधिक!

२.शेततळयांची संकल्पना अमलात आणल्यामुळेच हे शक्य झाले आहे असं येथील स्थानिक लोक सांगतात.

३.आज जे काही सुखाचे दिवस येथील शेतकऱ्यांच्या जीवनात आले ते केवळ या संकल्पनेचा अवलंब केल्यामुळेच. आणि म्हणूनच "शेततळे हीच आमची पुंजी आहे कारण त्यामुळेच आज आम्ही कमवू शकतो व आमची घरे चालवण्यास सक्षम आहोत",असेदेखील ते अभिमानाने सांगतात.आणि म्हणूनच पावसाळी शेतीसाठी कडवंची हे गाव अत्यंत उत्तम उदाहरण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Grapeyard
Grapeyardgoogle
  • इतरांसाठीही प्रेरणास्रोत-

कडवंची या गावाने इतर गावांनाही या संकल्पनेची अंमलबजावणी करण्यास प्रवृत्त केले आहे.जर अशा पद्धतींचा अवलंब प्रत्येक गावाने केला तर नक्कीच पाण्याचे संकट ओढवणार नाही.व जर प्रत्येकाने पाण्याचा योग्य वापर केला व त्याबाबत जागरूकता पसरवण्याचा प्रयत्न केला तर,आपण या मानवजातीला जलसंकटापासून नक्कीच वाचवत आहोत. आणि म्हणूनच...

"जाणा महत्त्व पाण्याचे

होईल कल्याण जीवनाचे..!"

लेखकः

निरज शिवाजी मेमाणे

AISSMS College of engineering ,Pune

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com