Asia Cup 2018 : भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा 

Rohit Sharma
Rohit Sharma

दुबई : भुवनेश्‍वर कुमार आणि केदार जाधवने रोखल्यानंतर भारतीय फलंदाजांनी निर्णायक घाव घालत बुधवारी आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारताने आठ गडी राखून विजय मिळवत स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केले. 

भारताविरुद्ध सामना जिंकून हिरो बनायला निघालेल्या पाकिस्तानी फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करतानाच शरणागती पत्करली. त्यांचा डाव 43.1 षटकांतच 162 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर भारताने 29 षटकांतच आव्हानाला गवसणी घालताना 2 बाद 164 धावा केल्या. रोहित शर्माचे अर्धशतक आणि शिखर धवन (46), अंबाती रायुडू (नाबाद 31), दिनेश कार्तिक (नाबाद 31) यांची उपयुक्त फलंदाजी भारताच्या विजयात निर्णायक ठरली. 

आव्हानाचा पाठलाग करताना भारतासमोर षटकांचे आव्हान नव्हते. त्यामुळे बिनधास्त फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी पाकिस्तानी गोलंदाजांवर वर्चस्व राखले. या जोडीने शतकी सलामी देताना भारताचा विजय सुकर केला. रोहित शर्माने वेगवान गोलंदाजांवर प्रेक्षणीय हल्ला चढवला. महंमद आमीर आणि उस्मान खानला रोहितने तगडे फटके लगावले. रोहितने मारलेला एक षटकार तर पहिल्या मजल्यावरच्या प्रेक्षकांत जाऊन पडला. वेगाची भीती तर सोडाच उलट दोघे भारतीय फलंदाज त्याच वेगाचा फायदा घेऊन चेंडू टोलवत राहिले. तडाखेबाज अर्धशतक करून रोहित शर्मा शादाबला बोल्ड झाला. शिखर धवन अर्धशतकापासून 4 धावा दूर असताना बाद झाला. विजया करता जेमतेम 60 धावा करायच्या बाकी असल्याने रायुडू आणि दिनेश कार्तिकने दडपण न घेता विजय साकार केला. 

त्यापूर्वी, पाकच्या पडझडीस सलामीपासूनच सुरवात झाली. इमाम उल हक भुवनेश्‍वरला उंचावून फटका मारताना, तर फखर झमान बुमराला टोलविताना सोपे झेल देऊन बाद झाले. तिसऱ्या विकेटकरिता शोएब मलिकने गुणवान बाबर आझमबरोबर मस्त फलंदाजी केली. शोएब मलिकला धोनीने 26 धावांवर जीवदान दिले. एकेरी धावांबरोबर दोघे फलंदाज मोठे फटके मारताना कचरत नव्हते. 
हार्दिक पंड्याच्या पाठीत उसण भरल्याने तो मैदानाबाहेर गेला. कुलदीप यादवने अफलातून गुगली टाकून बाबर आझमची 47 धावांची खेळी संपवली. कुलदीपला शोएब मलिकची विकेटही मिळाली असती; पण भुवनेश्‍वरने सोपा झेल सोडला. कर्णधार सर्फराझने जम बसायच्या आत हवेतून फटका मारायचा प्रयत्न केला. नशिबाची साथ लाभलेल्या शोएबला अखेर अंबाती रायुडूने अफलातून थ्रो करताना धावबाद केले. 
असिफ अली आणि शादाब खानला केदार जाधवची फिरकी झेपलीच नाही. हार्दिक पंड्याला दुखापत झाली असताना केदार जाधवने 9 षटकांत 3 फलंदाजांना बाद करून थेट परिणाम साधणारी गोलंदाजी केली. भुवनेश्‍वर कुमारने तळातील दोन फलंदाजांना बाद करून पाकिस्तानचा डाव 162 धावांवर संपवला. 

संक्षिप्त धावफलक ः 
पाकिस्तान 43.1 षटकांत 162 (बाबर आझम 47, शोएब मलिक 43, फहिम अश्रफ 21, भुवनेश्‍वर कुमार 3-15, केदार जाधव 3-23, बुमरा 2-23) पराभूत वि. भारत ः 29 षटकांत 2 बाद 164 (रोहित शर्मा 52 -39 चेंडू, 6 चौकार, 3 षटकार, शिखर धवन 46, अंबाती रायुडू नाबाद 31, दिनेश कार्तिक नाबाद 31, शादाब खान 1-6, फहीम अश्रफ 1-31) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com