मुंबई - तब्बल 40 कोटींच्या केटामाईन व मेथाएम्फेटामाईन या अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) आणखी पाच आरोपींना अटक केली आहे. पनवेल परिसरातील एका कारखान्यात तयार केलेले अमली पदार्थ साबणचुऱ्याच्या नावाखाली मलेशियाला पाठवले जात होते.
मलेशियातील आंतरराष्ट्रीय टोळी मुंबईलगतच्या शहरात अमली पदार्थांची निर्मिती करत असल्याची माहिती डीआरआयच्या मुंबई कक्षाला मिळाली होती. उच्चशिक्षित तरुणांच्या मदतीने या अमली पदार्थांची निर्यात केली जात असे. मिळालेल्या माहितीच्या आधारे डीआरआयच्या पथकाने मागील वर्षी जूनमध्ये पनवेलनजीक रसायनी परिसरात छापा टाकून अमली पदार्थांचा कारखाना उद्ध्वस्त केला. त्या ठिकाणी कपडे धुण्याच्या पावडरच्या नावाखाली केटामाईनची निर्मिती होत असल्याचे उघड झाले.
आरोपींनी 253 किलो केटामाईन 12 किलो मेथाएम्फेटामाईन हे अमली पदार्थ प्लॅस्टिक रोलमध्ये भरून मोठ्या पिशव्यांत लपवले होते. डीआरआयने नवी मुंबईतील कोपरखैरणे व तळोजा परिसरातील गोदामांवरही कारवाई केली आहे. या प्रकरणात यापूर्वी पाच जणांना अटक झाली होती. त्यानंतर आणखी पाच आरोपींना चेन्नईतून अटक करण्यात आली आहे. गणेशकुमार, नटराज कृष्णणन, एम. श्रीनिवास, एस. गोविंद राज व व्ही. शंकर अशी त्यांची नावे आहेत.
|