नगर - भारतीय जनता पक्षाने "मेक इन इंडिया'ची फक्त फसवी घोषणा दिली. एक लाख 42 हजार कंपन्या बंद पाडल्या. त्यातून बेरोजगारीचे प्रमाण वाढले. जातीजातींत तेढ निर्माण करणाऱ्या भाजप सरकारच्या संवेदना हरवल्या आहेत, अशा टीका युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केली.
जिल्हा ग्रामीण व शहर युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आयोजित बूथ कमिटी बैठकीदरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. शेख म्हणाले, 'सरकारने जेट एअरवेजसारख्या कंपन्या बंद पाडल्या. त्यामुळे 20 हजार लोकांना बेरोजगार व्हावे लागले. नागपूरसारख्या ठिकाणी बेरोजगारीच्या प्रश्नावर आजही हजारो तरुण रस्त्यावर उतरतात. सरकारचे हे मोठे अपयश आहे. हे सरकार केवळ निवडणूक आली की जातीयवादावर बोलून तेढ निर्माण करते. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.''
'रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून अनेकांचा जीव गेला. या धरणफुटीला खेकडे जबाबदार असल्याचे विधान जलसंधारणमंत्री करतो. "राष्ट्रवादी'ने तिवरे येथील पीडितांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत केली,'' असेही ते म्हणाले.
|