शिवरायांचे कार्य दिल्ली तख्तावर

शिवरायांचे कार्य दिल्ली तख्तावर

कोल्हापूर -  शिवजयंतीनिमित्त राजधानी दिल्लीत राष्ट्रोत्सवातून तीन दिवसांत महाराष्ट्राची यशोगाथा सादर केली जाणार आहे. तब्बल दोन हजारांहून अधिक महाराष्ट्रीयन कलाकार राष्ट्रोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य दिल्लीच्या कानाकोपऱ्यात पोचविण्याचे प्रयत्न यानिमित्ताने होत असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. राष्ट्रोत्सवाला रवाना होण्यासाठी आज कोल्हापुरातून करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी एक्‍स्प्रेस रवाना झाली.

शिवजयंती दिल्लीत साजरी करण्याचा निर्णय खासदार संभाजीराजे यांनी गतवर्षी घेतला. महोत्सवाला राष्ट्रपती, राज्यपाल यांच्यासह इतर प्रमुख पाहुणे उपस्थित राहिले. ढोल-ताशांच्या कडकडाटात शिवाजी महाराजांच्या जयघोषात शिवजयंती साजरी केली होती. आता त्याचे स्वरूप वाढविल्याचे सांगून संभाजीराजे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील तब्बल दोन हजारांहून अधिक कलाकार दिल्लीकडे रवाना झाले आहेत. यामध्ये ढोल-ताशांच्या पथकांसह लेझिम पथके, मर्दानी खेळांची पथके, तुतारीवाले, लोककला सादर करणारे कलाकार यांचा समावेश आहे. यानिमित्ताने महाराष्ट्राचे प्रेझेंटेशन राजधानी दिल्लीत करण्याची संधी मिळत आहे.’’

आज (ता. १९) लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन होणार असल्याचे सांगून संभाजीराजे म्हणाले, ‘‘शिवजयंती हा राजकीय कार्यक्रम होऊ नये, याचीही काळजी घेतली आहे. कोल्हापुरातून आज साधारण आठशे कार्यकर्ते दिल्लीला रवाना झालेत. यासाठी खास करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी नावाने एक्‍स्प्रेस रेल्वेचे नियोजन केले होते. या रेल्वेला असलेल्या १८ बोगींनाही किल्ल्यांची नावे दिली आहेत. ही रेल्वे जेथे जेथे थांबेल तेथे छत्रपती ताराराणी आणि गडकिल्ल्यांच्या नावाची चर्चा होईल. यानिमित्ताने पुन्हा एकदा इतिहासाला उजाळा मिळेल, अशी माझी भावना आहे. म्हणूनच रेल्वेला आणि बोगींना विशेष नावे दिली आहेत.’’

दिल्लीत होणाऱ्या शिवजयंतीचे नियोजन करण्यात सांगली जिल्ह्यातील तासगावमधील शिवभक्तांनी पुढाकार घेतल्याचे सांगून संभाजीराजे म्हणाले, ‘‘दिल्लीत साधारण शंभर-दीडशे महाराष्ट्रीयन लोक माझ्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रोत्सवाचे नियोजन करत आहेत. यामध्ये तासगावचे तरुण अधिक आहेत. कोल्हापूरसह इतर मिळून साधारण दीड-दोनशे महाराष्ट्रीयन राष्ट्रोत्सवाच्या नियोजनात व्यस्त आहेत. महाराष्ट्राच्या शौर्याची गाथा राजधानी दिल्ली दरबारी दाखविण्याची ही एक संधी महाराष्ट्रातील लोकांना दिली आहे. शिवजयंती निमित्ताने महाराष्ट्राचे प्रेझेंटेशन दिल्लीत करण्याची संधी मी खासदार असल्यामुळे उपलब्ध करून देऊ शकलो. भविष्यात प्रत्येक वर्षी १९ फेब्रुवारीला दिल्लीत मोठ्या थाटामाटात शिवजयंती होईल. याचेही नियोजन केले आहे.’’

भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
‘एक शाम छत्रपती शिवाजी महाराज के नाम’ हे घोषवाक्य घेऊन हा राष्ट्रोत्सव होत आहे. यात अखिल भारतीय कविसंमेलनाचा समावेश आहे. मेरठ, अयोध्या, उत्तर प्रदेश, नोएडा येथील कवी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आज (ता. १९) दुपारी चारला राष्ट्रोत्सवाला सुरवात होईल. सलग तीन दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून हा राष्ट्रोत्सव न्यू महाराष्ट्र सदन येथे साजरा होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com