रावेत बंधाऱ्याबाबत दिरंगाई

रावेत बंधाऱ्याबाबत दिरंगाई

पिंपरी - रावेत बंधाऱ्याची दुरुस्ती करून उंची वाढविण्यासाठी अथवा नवीन बंधारा बांधण्यासाठी आवश्‍यक असलेले सर्वेक्षण करण्यात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दिरंगाई होत असल्याने याबाबतचा निर्णय लांबणीवर पडू लागला आहे. गेले वर्षभर सर्वेक्षणाचे काम झालेले नाही. 

महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती प्राधिकरणाने रावेत येथील बंधाऱ्यातून पावसाळ्यातील चार महिने पाणी घेण्याचा आदेश महापालिकेला दिला आहे. उर्वरित आठ महिने पवना धरणातून पाणी घेण्यास प्राधिकरणाने सांगितले आहे. रावेतचा बंधारा कमी उंचीचा व गाळाने भरलेला असल्यामुळे तेथे पुरेसा साठा होत नाही. म्हणून नवीन बंधारा बांधण्याचा प्रस्ताव महापालिकेने २००८ मध्ये मांडला होता. पवना धरणापासून जलवाहिनी टाकण्याचा प्रकल्प सुरू झाल्यानंतर बंधाऱ्याचा प्रस्ताव मागे पडला.

पालकमंत्री गिरीश बापट यांनी गेल्याच वर्षी पंधरा दिवसांत रावेत बंधाऱ्याचे काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर जलसंपदा विभाग व महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. ‘सकाळ’ने त्याबाबतचे वृत्त दिल्यानंतर दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागा पाहणीही केली. भूगर्भ तपासणी तातडीने करण्याचे ठरले. त्यानंतर पुन्हा विलंब होऊ लागल्याने जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता तानाजी मुंढे आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची एप्रिलमध्ये बैठक झाली. त्या वेळी, सध्याच्या बंधाऱ्यातील गाळ महापालिकेने काढण्याचे ठरले. शंभर वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या बंधाऱ्याची स्थैर्यता तपासण्याचे ठरले. बंधाऱ्याची उंची वाढविण्याबाबत निर्णय घेण्यापूर्वी महापालिकेने सर्वेक्षण करावे. म्हणजे अर्धा ते दोन मीटर उंची वाढविल्यास पाण्याचा फुगवटा कोठपर्यंत जाईल, याचा अंदाज घेता येईल, असे ठरले. 

जलसंपदा विभागाने सर्वेक्षणासाठी त्या क्षेत्रातील नावेही महापालिकेला कळविली. मात्र, महापालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी काहीही हालचाल केली नाही. जलसंपदा विभाग आणि महापालिका अधिकारी यांच्या बैठकीत नुकताच हा प्रकार उघडकीस आला. जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांनी सर्वेक्षण आठ दिवसांत होऊ शकते. त्यासंदर्भात तातडीने निर्णय घेतल्यास येत्या एप्रिलपर्यंत काम पूर्ण करता येईल, असे मत मांडले. त्यावर सर्वेक्षण लवकर पूर्ण करण्याचे आश्‍वासन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांनी दिले.

निर्णय लवकरच
रावेत बंधारा गाळाने पूर्ण भरला आहे. गाळ वाहून गेल्यास आणि उंची वाढविल्यास शहरासाठी आठवडाभराचे पाणी त्यात साठविता येईल. धरणातून रोज नदीपात्रातून बाराशे घनफूट प्रतिसेकंद (क्‍यूसेक) वेगाने पाणी सोडण्यात येते. त्यातील सुमारे पाच कोटी लिटर पाणी पाझरते. त्या पाण्याची काही प्रमाणात बचत होऊ शकेल. त्यामुळे, बंधाऱ्याबाबतचा निर्णय लवकर घेण्याची आवश्‍यकता आहे, असे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com