पुण्यात माजी सैनिकांच्या मुलांची फरपट; वसतीगृहात अधीक्षकाची दहशत

पुण्यात माजी सैनिकांच्या मुलांची फरपट; वसतीगृहात अधीक्षकाची दहशत

पुणे  - लष्करातून निवृत्त झाल्यानंतर आपल्या मुलांना शहरात उच्च शिक्षणासाठी पाठविणाऱ्या माजी सैनिकांच्या मुलांच्या वाट्याला काय येते?... वास्तव वाचाल, तर तुमच्या संतापाला पारावार राहणार नाही. पुण्यात माजी सैनिकांच्या मुलांसाठी असलेल्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना शिवीगाळ आणि अत्याचार सहन करावा लागतोच; शिवाय अन्नापाण्याची आबाळही होते. वसतिगृह अधीक्षकाच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलाल, तर संपवून टाकण्याची भाषाही ऐकावी लागते. 

पुण्याच्या पर्वती भागात जिल्हा सैनिक कल्याण विभागामार्फत माजी सैनिकांच्या मुलांसाठी वसतिगृह चालविले जाते. विविध जिल्ह्यांतून आलेले १७२ मुले तेथे वास्तव्यास असून, ते पदवी आणि पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहेत. याचा सर्व खर्च ध्वजनिधीतून संकलित होणाऱ्या पैशांतून केला जातो. मात्र हा पैसा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची खिसे भरण्यासाठी वापरला जात असल्याचे समोर आले आहे. अधीक्षक गोविंद साळुंखे यांच्याविषयी तक्रारीदेखील करण्यात आल्या आहेत.

साळुंखेदेखील लष्करातील निवृत्त कर्मचारी आहेत. ते जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून निश्‍चित झालेल्या मेनूनुसार अन्न वितरण करीत नाहीत, अन्नधान्याची कोरी बिले घेऊन, त्यावर जादा रक्कम लिहून ती लाटली जाते, असे त्यांच्यावर आरोप आहेत. गैरहजर विद्यार्थ्यांना हजर दाखवून, त्यांचा दैनंदिन खर्चासाठी आलेला पैसाही हडप केला जातो. स्वयंपाकघर अस्वच्छ असल्याने झुरळांचा प्रादुर्भाव आहे. अनेक वेळा अन्नातही किडे आढळतात. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार आणि गोविंद साळुंखे यांच्या वादात अन्नधान्याची खरेदीही उशिरा होते, असे विद्यार्थ्यांच्या म्हणणे आहे.

अद्याप कारवाई नाही 
साळुंखे यांच्याविषयी जिल्हा सैनिक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तीन सदस्यांची चौकशी समिती स्थापन झाली. समितीने चौकशी करून, त्याचा अहवालही ४ जानेवारीला सादर केला. मात्र साळुंखे यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही.

सरकारी स्तरावरही अनास्था
पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांच्याकडे सैनिक कल्याण विभागाच्या संचालकपदाचा कार्यभार होता. चौकशी होऊनही कारवाई का नाही, असे विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘वसतिगृहाबाबत अनेक तक्रारी आहेत. माझ्या कार्यालयाचे खूप काम होते. त्यामुळे सैनिक कल्याणच्या कामाकडे लक्ष देता आले नाही. आता या पदाचा कार्यभार माझ्याकडे नाही. त्यामुळे याबाबत भाष्य करू शकत नाही.’’

वाचा चौकशीतील सत्य
माजी सैनिक मुलांच्या वसतिगृहातील गैरप्रकार आणि अधीक्षक साळुंखे यांच्या चौकशीचा अहवाल ‘सकाळ’च्या हाती आला आहे. त्यातून सत्य समोर आले आहे. उच्च शिक्षण घेऊ पाहणाऱ्या या मुलांना कोणत्या त्रासाला तोंड द्यावे लागते, याची चुणूक या अहवालात आहेच; शिवाय साळुंके यांचे कारनामेही आहेत. या अहवालातील सत्य उद्यापासून मालिका स्वरूपात मांडत आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com