नाशिकः कुणी पुलंच्या साहित्यातील फुलराणी सादर केली तर कुणी त्यांच्या साहित्यातील पात्र असलेले नारायण, वटवट्या अशी पात्रे रंगवली. कुणी पुलंची कविता समजून दुसऱ्याच साहित्यिकाची कविता सादर केली तर कुणी आपल्या कसदार अभिनयाने रसिकांना खिळवून ठेवत होते. शहरासह विविध तालुक्यातील सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या धम्माल सादरीकरणाने स्पर्धेत रंगत आणली.
या स्पर्धेत अर्चना गांगुर्डे हिने वीस हजार रूपयांचे प्रथम तर उमेश सोनवणे याने पंधरा हजार रूपयांचे द्वितीय पारितोषिक मिळवले. रावसाहेब थोरात सभागृहात सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांनी लिहिलेल्या एकांकिका, नाटक, कथा, ललितलेख अशा साहित्यावर आधारीत एकपात्री "स्टॅण्ड अप कॉमेडी स्पर्धा' झाली. ही स्पर्धा महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात घेण्यात येणार आहे. याची सुरूवात आज नाशिकपासून झाली. स्पर्धेचे उद्घाटन मविप्रचे संचालक नानासाहेब महाले, सांस्कृतिक संचालनालयाच्या संचालक मीनल जोगळेकर, कार्यक्रम अधिकारी संदीप शेंडे, परीक्षक अनिल सोनार, संजय कळमकर, शाम राजपूत यांच्या उपस्थितीत झाले.
आज सकाळी या स्पर्धेत जिल्हाभरातून आलेल्या स्पर्धकांनी महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यातील विविध पात्र आज रंगमंचावर साकारली. त्यानिमित्ताने स्पर्धकांनी उपस्थित रसिकांना खळखळून हसवले. या स्पर्धेत एकूण या स्पर्धेत एकूण 24 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेतील विजेत्यांना संचालक मीनल जोगळेकर, प्राचार्य व्ही. बी. गायकवाड, प्रा. डी. पी. पवार आणि परीक्षक यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
१२ वर्षापुढील सर्वांना संधी
मीनल जोगळेकर म्हणाल्या, की आजपासून ही स्पर्धा राज्यभर घेण्यात येणार आहे. नाशिककरांनी त्याला चांगला प्रतिसाद देऊन श्रीगणेशा केला आहे. 12 वर्षापुढील सर्वांनाच या स्पर्धेत सहभाग घेण्याची संधी असल्याने आपल्यातील कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही स्पर्धा म्हणजे चांगली संधी आहे.
श्री. सोनार यांनी सांगितले, की स्पर्धकांनी आवाज कसा लावायचा, आवाजाची पट्टी कशी असावी याचा अभ्यास केला पाहिजे. एका पात्रात अनेक रूपं सादर करता आली पाहिजे. अनेकांनी "ती फुलराणी' सादर केली. "तुझे आज तुजपाशी' नाटकातील एकही व्यक्तीरेखा सादर झाली नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे अजून खूप अभ्यास करण्याची गरज आहे.
सुवर्णा गायकवाड यांनी सुत्रसंचालन केले.
कलावंतानी फिरवली पाठ
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यावर आधारीत घेतलेल्या या स्पर्धेकडे शहरातील स्थानिक कलावंतांनी पाठ फिरवली. 12 वर्षावरील सर्वांसाठी ही स्पर्धा खुली असतानाही त्याकडे कलावंत फिरकलेच नाहीत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.