उपराजधानीत चार तासांत तीन खून 

उपराजधानीत चार तासांत तीन खून 

नागपूर - मुख्यमंत्र्यांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपराजधानीत बुधवारी रात्री वेगवेगळ्या भागात अवघ्या चार तासांत तीन हत्याकांड घडले. यामध्ये एका नामांकित प्रॉपर्टी डीलरसह दोन तरूणांचा समावेश आहे. त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. पोलिसांचा वचक नसल्यामुळे गुंडांनी तोंड बाहेर काढले आहे. आरोपींमध्ये युथ फोर्सचा संस्थापक अध्यक्ष मिकी बक्षीसह अन्य आरोपींचा समावेश आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्याकांडाच्या मालिकेतील पहिली घटना नंदनवनमधील केडीके कॉलेज रोडवरील राजेंद्रनगर येथे घडली. गरीब नवाज चौक, खरबी येथे राहणारा मो. आसिफ शेख मो. सईद (25) हा हातठेल्यावर सांबार, मिरची, अद्रक विकण्याचा धंदा करतो. नेहमीप्रमाणेच बुधवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास तो राजेंद्रनगर येथील स्टेट बॅंकेच्या एटीएमसमोर हातठेला घेऊन उभा होता. त्यावेळी तीन अनोळखी आरोपी त्याच्या ठेल्यावर आले. त्यापैकी एकाने अद्रक आणि मिरची खरेदी करून दुचाकीच्या डिक्कीत ठेवले आणि पैसे न देता ते जाऊ लागले. मो. आसिफने त्यांना पैसे मागितले असता आरोपींनी त्याला शिवीगाळ करून त्याची कॉलर पकडली आणि मांडीवर चाकूने वार केला. त्याचवेळी आसिफचा मित्र सय्यद इमरान सय्यद नियाज (22) हसनबाग हा आसिफला वाचविण्यासाठी आला असता आरोपींनी इमरानला पकडून त्याच्यावर छातीवर चाकूने वार करून त्याला जागीच ठार केले. त्याचप्रमाणे गल्ल्‌यातील एक हजार रुपये काढून पोबारा केला. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

दुसरे हत्याकांड नंदनवनमधील मुंगसाजी नगरात घडले. सेनापतीनगर येथे राहणाऱ्या विक्की विजय डहाके (22) याचा अज्ञात मारेकऱ्यांनी खून केला. विक्की हा हातमजुरी करीत असे. बुधवारी रात्री 11 वाजेपूर्वी सेनापतीनगरच्या मोकळ्या मैदानात तो मृतावस्थेत मिळून आला. अज्ञात आरोपींनी त्याच्या पोटावर, पाठीवर, पायावर वार करून त्याला जागीच ठार केले. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

तिसरे हत्याकांड नागपूर शहराच्या अगदी मध्यभागी सदरमध्ये घडले. कुलरचा व्यवसाय करणाऱ्या ऋषी खोसला यांची हल्लेखोरांनी रस्त्यात अडवून हत्या केली. मध्यरात्रीच्या सुमारास ऋषी खोसला कारने घराकडे जात असताना युथ फोर्सचा संस्थापक मिकी बक्षी आणि त्याच्या साथिदारांनी कार अडवत ऋषी यांना गाडीबाहेर ओढून काढले. त्यानंतर त्यांची धारधार शस्त्राने हत्या केली. एकाच रात्री अवघ्या चार तासात घडलेल्या या घटनांमुळे नागपुरात खळबळ माजली आहे. या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासन हल्लेखोरांना पकडण्यासाठी रवाना झाले आहे. मात्र अशा घटनांमुळे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभं झालं असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. शहरात पोलिसांचे राज्य आहे की गुंडांचे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com