जळगाव (जा) (बुलढाणा) : खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्व पीके शेतकऱ्यांच्या हातून गेली असून जळगाव, संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना कसलीही शासकीय आर्थिक मदत मिळाली नाही. कपाशी, सोयाबीन, उडीद, मुगासह सर्व पीके नामशेष झाली असली तरी पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास टाळाटाळ करीत आहेत. एल्गार संघटनेसह विविध पक्ष संघटनांनी केलेल्या आंदोलनाला सुद्धा शासन आणि पीक विमा कंपन्यांनी थारा दिला नाही, तरी शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत सर्व शेतकऱ्यांना पीक विमा देण्यासाठी कृषिमंत्री म्हणून आपण विमा कंपन्यांवर दबाव आणून पीकविमा मिळवून द्यावा, अशी विनंती एल्गार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसेनजीत पाटील यांनी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली.
एल्गारच्या निवेदनावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर शेतकऱ्यांची मागणी रास्त असून एक ते दीड महिन्यात टप्प्याटप्प्याने सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करू, अशी ग्वाही कृषिमंत्री नामदार दादाजी भुसे यांनी यावेळी दिली. एल्गारचे संस्थापक प्रसेनजीत पाटील आणि सिंदखेड राजा मतदार संघाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी संयुक्तरीत्या मुंबई निवासस्थानी कृषिमंत्री यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. कृषिमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.
पीकवीमा कंपनी महसूल विभाग, कृषि विभाग व विमा कंपनी यांनी काढलेला संयुक्त पीक कापनी अहवाल व आणेवारी झुगारण्याच्या मनस्थितीत आहे. काही खासगी पीकविमा कंपनी शेतकऱ्यांना फसवण्याचे काम करीत आहेत. त्यांना वठणीवर आणण्याचे काम आम्ही करू, तसेच कुठल्याही परिस्थितीत आम्ही शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही शेतकऱ्यांना खात्रीने पीकवीमा मंजूर करण्यात येईल, असे आश्वासन कृषिमंत्री दादाजी भूसे यांनी एल्गार संघटनेचे अध्यक्ष प्रसेनजीत पाटील यांना दिले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.