पंजाब सरकार प्रामाणिक: अरविंद केजरीवाल
जालंधर : पंजाबमधील मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील आपचे सरकार अत्यंत प्रामाणिक असून आतापर्यंतच्या तीन महिन्यांच्या काळात भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी अनेक पावले उचलताना कठोर निर्णय घेण्यासही सरकारने मागेपुढे पाहिले नाही, अशा शब्दांत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी मान सरकारचे कौतुक केले. भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर पंजाबचे आरोग्यमंत्री विजय सिंगला यांची मुख्यमंत्री मान यांनी हकालपट्टी केली होती. त्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी मान सरकारवर स्तुतिसुमने उधळली. जालंधरहून दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतच्या लक्झरी बससेवेच्या उद्घाटनपर कार्यक्रमात ते बोलत होते. केजरीवाल व मान यांनी बसला झेंडा दाखविला. केजरीवाल यांनी पूर्वीच्या सरकारांवरही हल्ला चढविला. विरोधक सुव्यवस्थेवरून मान सरकारला प्रश्न विचारत आहेत. मात्र, पूर्वीच्या सरकारमध्ये गुंडांना राजकीय आश्रय मिळत होता , असे त्यांनी नमूद केले.
पंजाब सरकारने भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन सुरू करण्यासह अनेक पावले उचलली आहेत. पंजाबच्या जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जातील आणि पंजाबला पुन्हा गतवैभव मिळवून देऊ.
- अरविंद केजरीवाल, राष्ट्रीय निमंत्रक, आप
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.