नवी दिल्ली - ताज महाल हा एका "देशद्रोह्या'ने बांधला असल्याचे विधान भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उत्तर प्रदेशातील आमदार संगीत सोम यांनी केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.
"ताजमहाल हा एका देशद्रोह्याने बांधला असेल; तर लाल किल्लाही देशद्रोह्यानेच बांधला आहे. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण करणे थांबविणार आहेत काय? मोदी व योगी आदित्यनाथ हे ताजमहालला भेट देऊ नका, असे आता परकीय व देशांतर्गत पर्यटकांना सांगणार आहेत काय? भारताच्या राजधानीमधील प्रसिद्ध हैदराबाद हाऊसची निर्मितीही देशद्रोह्यांनीच केली आहे. मग परकीय शिष्टमंडळांचे येथे स्वागत करण्याची प्रथा मोदी थांबविणार आहेत काय?,'' अशी आक्रमक विचारणा सोम यांच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे.
ताजमहाल हा भारतीय संस्कृतीवरचा एक डाग असल्याचे विधान सोम यांनी केले होते. सोम यांच्या या विधानावर ओवैसींनी कडाडून टीका केली. ""कोणत्याही राज्यात सुशासन निर्माण करणे, ही तेथील सरकारची जबाबदारी असावयास हवी. उत्तर प्रदेशमधील सरकार अपयशी ठरले आहे. यामुळे समाजामध्ये ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये प्राणवायुच्या कमतरतेमुळे रुग्णालयांमध्ये लहान मुले मृत्युमुखी पडत आहे. मात्र मोदी व योगी आदित्यनाथ द्वेषाने आंधळे झाले आहेत,'' असे ओवैसी म्हणाले.
सोम यांच्या या विधानावर समाजवादी पक्ष आणि जम्मु काश्मीरचे माजी मुख्यमंत्री असलेल्या ओमर अब्दुल्ला यांनीही टीका केली आहे. ""लाल किल्लाही देशद्रोह्यांनी बांधला असल्याने आता पंतप्रधान तेथून 15 ऑगस्टला भाषण करणार नाहीत काय?,'' अशी उपहासात्मक विचारणा अब्दुल्लांनी केली आहे.
|