पाटणा - अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देणाऱ्या आई-वडिलांवर तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली आहे. बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात ही घटना घडली. बालविवाह कायद्यानुसार कडक कारवाई केल्याचे हे राज्यातील पहिलेच उदाहरण आहे.
अल्पवयीन मुलीचा विवाह करणाऱ्या आईवडिलांना बालविवाह कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून तुरुंगात ठेवण्याचा आदेश स्थानिक न्यायालयाने बुधवारी (ता.17) दिला आहे. त्यानुसार पोलिसांनी त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे. अटक होण्याच्या भीतीने वराचे आईवडील फरारी झाले आहेत. अल्पवयीन मुलीचा विवाह करून दिल्याच्या आरोपावरून तिची आई सुनीता देवी आणि वडील कुशेश्वर ठाकूर यांना तुरुंगात ठेवण्याचा आदेश मधुबनीचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी शैलेंद्र कुमार शर्मा यांनी दिला. पतीराजांना तुरुंगात डांबण्याचा व मुलीला सुधारगृहात पाठविण्याचा आदेशही दिला.
सरकारी वकील धर्मेश कुमार यांनी न्यायालयात सांगितले की, मधुबनी जिल्ह्यात देवधा पोलिस ठाण्याअंतर्गत 17 वर्षांच्या मुलीचा विवाह 20 वर्षांच्या रवींद्रबरोबर झाला होता. या विवाहात वधुवराच्या कुटुंबासह ग्रामस्थही सहभागी झाले होते. पोलिस तपासात वधुवराचे वय विवाहायोग्य नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. वधुवरांना सोडविण्यासाठी मुलीचे आईवडील न्यायालयात गेले. त्यांनी सामाजिक जबाबदारी व सामाजिक दबावाचे कारण विवाहासाठी दिले. पण न्यायालयाने त्यांचे स्पष्टीकरण फेटाळून लावत त्यांना तुरुंगात पाठविण्याचा आदेश दिला.
रविवारी मानवी साखळी
बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्या सरकारने बाल विवाह आणि हुंड्याच्या प्रथेविरोधात रविवारी (ता.21) राज्यात मानवी साखळी करून जनजागृती करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यात चार कोटी नागरिक सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
|